नाशिक पुणे महामार्गावर कारचे टायर फुटल्याने, कारने घेतल्या तीन पलट्या ...!
संगमनेर । प्रतिनिधी( ऋषिकेश जगताप) :
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे नाशिक-पुणे महामार्गावर कारचे टायर फुटल्याने कार तीन वेळा उलटल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील तिघे जण बचावले आहे.
या अपघातात कार चालकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिकहून पुण्याकडे जाणार्या कारचे टायर फुटल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला.
राहुल दौलतराव बडवर रा. वाकद ता. निफाड, जिल्हा नाशिक, पत्नी प्रियांका व मुलगा अन्वेष हे सोमवारी सकाळी कारमधून (क्रमांक एम.एच. १४, जे. ए. २९२६) नाशिक पुणे महामार्गाने मोशी येथे जात होते. संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात आले असता सकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान कारचा अचानक डाव्या बाजूचा टायर फुटल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारने तीन पलट्या घेतल्या. यामध्ये कारची चारही चाके वाट झाली होती.
सुदैवाने या अपघातात हे कुटुंब बचावले असून राहुल बडवर यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे.

