पुणे:-उद्योगपती रतन टाटा यांच्या दातृत्वाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. आपल्या कर्मचा-यांप्रती ते नेहमीच आपुलकी दाखवत असतात. कोथरूडमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. टाटा कंपनीत काम करणारा एक माजी कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून आजाराशी झुंजत असल्याची बातमी टाटा यांच्या कानावर आली. टाटा मुंबई ते पुणे प्रवास करीत कर्मचाऱ्याच्या घरी पोहचले आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
भेट दिलेल्या कुटुंबियाच्या मित्र योगेश देसाई यांनी लिंक्डइनवर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. ‘रतन टाटा वय वर्ष 83 असताना देखील मुंबई ते पुणे प्रवास करीत दोन वर्षांपासून आजारी असलेल्या कर्मचाऱ्याची भेट घेण्यासाठी आले. महान व्यक्तीमहत्वाची हिच खासीयत असते. मिडीया नाही, ना सुरक्षारक्षक नाहित. फक्त आपल्या कर्मचा-याची आपुलकिने चौकशी करण्यासाठी ते पुण्यात दाखल झाले. पैशा पेक्षा माणुसकी हा धर्मच मोठा असतो.’ सर, तुम्हाला सलाम ! असं देसाई यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटल आहे.
यातूनच रतन टाटा यांचा मोठेपणा दिसून येतो. आपला उद्योगसमूह वाढण्यासाठी झटलेल्या कर्मचाऱ्यांविषयी त्यांची आपुलकी यातून दिसत आहे.
कोरोना काळात कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले, पगार कपात केली. यावर रतन टाटा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘कठीण काळात कंपन्यांवर कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. संकटाच्या काळात आपण आपल्या कर्मचार्यांशी असे वागता, हीच तुमची नैतिकता आहे का? असा सवालही टाटा यांनी उपस्थित केला. ही तिच लोकं आहेत, ज्यांनी तुमच्यासाठी काम केलंय, तुमच्या कंपनीसाठी आयुष्य देणा-या या लोकांना तुम्ही आज उघड्यावर सोडून देत आहात, ही तुमच्या नितीमत्तेची व्याख्या आहे का? असं रतन टाटा यांनी म्हटलं होतं.

