अलिबाग । प्रतिनिधी (राजेश बाष्टे):
माझी वसुंधरा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या उपस्थितीत आज हरित शपथ कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, सहाय्यक पुरवठा अधिकारी श्री.गाेविंद वाकडे तसेच अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेली शपथ.....
मी शपथ घेतो की, मी माझ्या विशेष प्रसंगी (वाढदिवस लग्नाचा वाढदिवस इ.) किमान 5 झाडे लावीन आणि त्याचे संगोपन करेन. प्रवास करत असताना कायम हरित माध्यमांचा पर्याय निवडेन तसेच हरित वाहतुकीची निवड करेन. पाण्याचा अपव्यय टाळेन व पाण्याचा काळजीपूर्वक कमी वापर करेन. वीजेचा अपव्यय टाळून वीजेचा वापर कमी करेन. सेंद्रीय कंपोस्ट वापरून भाज्या व फळे पिकविण्यासाठी माझ्या बाल्कनी/ गॅलरी/ घरामागील परिसरात किचन गार्डन विकसित करेन. माझ्या दैनंदिन जीवनात जाणीवपूर्वक वस्तूंचा पुनर्वापर करण्याचा सराव करेन. मी एकदा वापरण्यायोग्य प्लास्टिकच्या वस्तूंचा पुनर्वापर करणार नाही. माझ्या घरगुती कचऱ्याचे कोरड्या आणि ओल्या कचऱ्याच्या स्वरूपात वर्गीकरण करेन. माझ्या घरात अन्न वाया घालवणार नाही आणि कार्यक्रम/ संमेलने/ मेजवानीमधील शिल्लक अन्न गरजूंना दान करेन. ई-कचऱ्याची तसेच इतर घातक साहित्याची जबाबदारीने विल्हेवाट लावेन आणि ते योग्य विल्हेवाट सुविधेत पाठवेन. हरित महोत्सव साजरे करेन. हरित भेटवस्तू पर्यायांची निवड करेन. माझ्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीची सुरूवात करेन. माझ्या /आमच्या इमारतींच्या गच्चीवर सोलर पॅनल स्थापित करेन. मी मुलांना जंगलाविषयी माहिती होण्यासाठी जवळच्या डोंगर, जंगल, सामुदायिक बागांमध्ये एक दिवसीय सहलीची व्यवस्था करेन. स्थानिक पाणवठे आणि स्थानिक वने/ हरित क्षेत्रे यांची काळजी घेण्यास मदत करेन.

