पुणे:-राज्यात सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकारण पेटलेले असतानाच आता पुणे शहराचे नाव बदलण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. पुणे शहराला जिजापूर असे नाव देण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे. संभाजी ब्रिगेडची ही मागणी जुनीच असून नामांतराच्या मुद्दा पुन्हा एकदा समोर आल्यानंतर त्यांनी ही आपली मागणी पुढे रेटली आहे.
यावेळी बोलताना संतोष शिंदे म्हणाले, राष्ट्रमाता जिजाऊंनी बेचिराख झालेल्या पुणे’ला वसवलं. त्या पुण्याला जिजाऊंचे नाव देऊन पुण्याचे ‘जिजापूर’ असे नामांतर करून टाका. पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे.
शिवनेरी पासून लाल महालपर्यंत आणि पुरंदर पासून तोरणा, राजगड, सिंहगड, विसापूर, लोहगड, राजमाची, विचित्रगड ते स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर पर्यंत सह्याद्री ओरडून ओरडून कर्तुत्व आणि पराक्रमाचा इतिहास सांगत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आपला पुणे जिल्हा आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे. पुण्यात राष्ट्रमाता जिजाऊंनी बाल शिवबा’ला घेऊन सोन्याचा नांगर चालून पुणे वसवलं, त्या पुण्याचं आज सोनं झालेले आहे. घडलं ते रयतेच स्वराज्य.
नामांतराचे गलिच्छ राजकारणाचा करू नका. इतिहासातील प्रतिकांचा आदर करा. थोरात साहेब, टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळणार आणि पचणार नाही, आमचा वारसा आम्हाला अजून गौरवपुर्वक चालवू द्या. म्हणून पुण्याला ‘जिजापुर’ हे नाव द्या…

