shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शाहीर जंगम स्वामींचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान लाख-मोलाचे .. :- माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांचे प्रतिपादन.

शाहीर जंगम स्वामींचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान लाख-मोलाचे .. :- माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांचे प्रतिपादन. 
                                  
 इंदापूर प्रतिनिधी :- स्वातंत्र्य सेनानी तथा लोकशाहीर जंगम स्वामी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी होऊन महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे प्रतिपादन भिमाई आश्रमशाळेत शाहीर जंगम स्वामींच्या स्मृतिदिनी इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष व संस्थाप्रमुख रत्नाकर मखरे यांनी केले.
भिमाई आश्रमशाळेत लोकशाहीर जंगम स्वामी यांचा स्मृतिदिन संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी मखरे म्हणाले की, विख्यात मराठी शाहीर, शिवलिंग विभुते तथा शाहीर जंगम स्वामी यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भोंगवली ह्या खेडेगावात लिंगायत समाजातील जंगम कुटुंबात झाला. त्यांचे वडील वारकरी परंपरेचे पालन करणारे प्रवचनकार व किर्तनकार होते. त्यांचा प्रभाव जंगम स्वामी यांच्यावर पडला. आणि पुढे ते शाळा शिकता शिकता प्रवचन करू लागले. 
पुढे मखरे म्हणाले की, जंगम स्वामींच्या प्रबोधन कार्यातील योगदानाबद्दल लोकशाहीर ही उपाधी बहाल करण्यात आली. मराठी प्रमाणेच कानडी भाषेतही जंगम स्वामींनी पोवाडा रचला होता. जनजागृतीच्या कार्यातील लोक कलेचे सामर्थ्य जंगम स्वामींनी अचूक ओळखले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर सन १९५७ मध्ये जंगम स्वामींनी समतावादी बौद्ध धम्म अंगीकारला आणि नागसेन विभुते असे नाव धारण केले. ' कला ही आपली आई आहे ' अशी भूमिका अंगी बाणवून  स्वामींनी जीवनभर प्रबोधनाचे कार्य केले. स्वामींचा १०० वा वाढदिवस भिमाई आश्रमशाळेत साजरा केला होता. त्यांची आठवण राहावी, म्हणून माझ्या संस्थेच्या मुलींच्या निवासी वसतिगृहाला "शाहीर नागसेन तथा जंगम स्वामी" हे नाव दिले असल्याचे शेवटी मखरेंनी म्हटले आहे.
स्मृतिदिन कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते अश्वजीत कांबळे व संस्थेतील प्राचार्या, उप- प्राचार्या,मुख्याध्यापक, अधिक्षक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक साहेबराव पवार  यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम स्थळी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उपस्थितांनी काळजी घेतली.
close