अकरा लाख व स्मृतिचिन्ह मिळणार- ग्राम विकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांची घोषणा..!
सावळीविहीर( प्रतिनिधी):
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समितीला नाशिक विभागात यशवंत पंचायत राज अभियान 20 -21 अंतर्गत प्रथम पुरस्कार घोषित झाला आहे. अकरा लाख रुपयाचे पारितोषिक यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत राहाता पंचायत समितीला मिळणार आहे, अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी नुकतीच केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना राहाता पंचायत समितीचे उपसभापती ओमेश साहेबराव जपे यांनी सांगितले की, राहाता तालुका पंचायत समितीच्या वतीने यशवंत पंचायतराज अभियान 20- 21 अंतर्गत राहाता पंचायत समितीने सहभाग घेऊन विविध योजना येथे राबविण्यात आल्या.
तालुक्यात विविध विकास कामे करण्यात आली. त्यामुळे या पंचायत समितीच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने यशवंत पंचायत राज अभियान 20 -21 अंतर्गत राहाता पंचायत समितीला नाशिक विभागात प्रथम क्रमांक जाहीर केला असून त्यासाठी 11 लाख रुपयांचे बक्षीसही राहाता पंचायत समितीला मिळणार आहे.
या पंचायतराज अभियानांतर्गत येथील सभापती उपसभापती सर्व पंचायत समितीचे सदस्य, गटविकास अधिकारी तसेच सर्व अधिकारी कर्मचारी यांनीही मोठे प्रयत्न केले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील ,माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती उपसभापती व गट विकास अधिकारी येथे तालुक्यात चांगले काम करत असल्यामुळे हा पुरस्कार मिळाला असल्याचेही राहाता तालुक्यातील नागरिकांमधून बोलले जात असून हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राहाता पंचायत समितीचे सभापती सौ तांबे ,उपसभापती ओमेश साहेबराव जपे,गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व ग्रामविकास अधिकारी यांचे सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

