वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..!
शिरसगाव । वार्ताहर :- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे मानवतेचा , लोकशाहीचा अमृतग्रन्थ असून त्यांचे कार्य, विचार म्हणजे देशभक्तीचा आदर्श होय असे मत सामाजिक कार्यकर्ते, एल.आय.सी चे .ए. ए. ओ. अधिकारी फकिरा वाघमारे यांनी व्यक्त केले.
येथील इंदिरानगरमधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती प्रतिमापूजन, पुस्तकवाचन, प्रकाशन, कवितावाचन, मनोगत अशा उपक्रमातून साजरी करण्यात आली. फकिरा वाघमारे व सौ. सुनंदा वाघमारे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.सौ. मंदाकिनी उपाध्ये, गणेशानंद उपाध्ये, सौ.आरती उपाध्ये, चेतन्य वाघमारे,निर्मिक उपाध्ये यांनी पुष्पांजली अर्पण केली.
संयोजक डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी प्रतिमा पूजन करून स्वागत, प्रास्ताविक केले. "वंदन हे महामानवाला " ही कविता सादर केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अफाट बुद्धिमत्ता, प्रामाणिक देशभक्ती,माणुसकीचे तत्वज्ञान,प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टी स्वीकारून समाज कल्याणाची भूमिका हे सर्वच वंदनीय, कृतिशील आहे असे विचार डॉ. उपाध्ये यांनी मांडले.
प्रारंभी प्राचार्य तुळशीराम शेळके यांनी कार्यक्रमात ऑनलाईन मनोगत व्यक्त करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताला लाभलेले सर्वात मोठे व्यक्तिमत्व होय, त्यांनी लिहिलेले संविधान हे लोकशाहीचे बलस्थान आहे, तो आदर्श जपला वाढविला पाहिजे असे मत व्यक्त करून वाचन संस्कृती प्रतिष्ठान उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. सौ. सुनंदा वाघमारे यांनी असे उपक्रम उगवत्या पिढीला,बालमनाला संस्कारी बनवतात असे सांगून डॉ.आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन केले.सौ. आरती उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.

