प्रतिनिधी । मोहन शेगर :-
मुबंई :-राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. 'कठीण परिस्थितीतून आपण चाललो आहोत. लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही पण जगाने तो स्वीकारला आहे.' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत म्हटलं आहे.
वॅक्सिनचे दोन्ही डोस घेतल्या नंतर काही व्यक्ती कोरोना पॉस्टिव्ह आढळल्या आहेत या बाबत पंतप्रधान यांच्याशी बोललो. देवेंद्र फडणवीसजी काल आपण बैठकीत नव्हता आपल्यासाठी ही बैठक आहे. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, मधला काळ बरा होता. तरुण वर्ग आता जास्त बाधित होतोय. आपल्याला एकमुखाने निर्णय घ्यायचा आहे. असं ही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत आहे. बेड्स उपलब्ध नाहीत. वेंटिलेटर फूल आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर आता प्रचंड ताण येऊ लागला आहे. कोरोनाचे रुग्ण रोज झपाट्याने वाढत असल्याने त्याला रोखण्याचं मोठं आव्हान सरकारपुढे असणार आहे.
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हा आता चिंतेचा विषय बनला आहे. कडक निर्बंध लागू करुनही रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचं अनेकांचं मत आहे. लॉकडाऊनमुळे पुन्हा आर्थिक घडी मोडण्याची शक्यता आहे. पण नागरिकांचा जीव आणि आरोग्य हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

