येवला:(प्रतिनिधी -संतोष राऊळ ):
जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून जिल्ह्याचा पॉसिटीव्ह रेटही कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात 12मे ते 23मे लागू असलेला कडक लॉकडाउन 23मे च्या मध्यरात्री 12 वाजेनंतर अटी शिथिल करण्यात येणार आहे.तसेच जिल्याह्यातील औद्योगिक क्षेत्र व बाजार समित्या कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या आधीन राहून सुरु करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि येवल्याचे भाग्यविधाते आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
दि. 21 मे रोजी छगन भुजबळ यांनी मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे कोरोना बाबत सद्यस्तिथीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, मालेगाव महानगरपालिकेचे भालचंद्र गोसावी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी आपल्या कार्यालयातून दूरदृश्यप्रणाली द्वारे बैठकीस उपस्थित होते.
उद्योग सुरु करताना कारखान्यात येणाऱ्या प्रत्येक कामगार व त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी घेत असल्याचे कंपनीचे हमीपत्र घ्यावे. तसेच कारखान्यांमध्ये कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून कामकाज सुरु करण्यात यावे.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून कोविड सेंटरच्या सुविधा कायम ठेवण्यात याव्या. तसेच जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांटचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. कोरोना काळातील लॉकडाउन मध्ये पोलिसांनी चांगली कामगिरी बजावली असून यापुढेही कुठे गर्दी होणार नाही तसेच निर्बंधाचे कडक पालन होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

