राजेश बाष्टे ।अलिबाग प्रतिनिधी:-
रिक्षात विसरून राहिलेले तब्बल लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग खारघर पोलीसांनी काही तासातच परत मिळवली आहे. लक्ष्मीबाई दवंडे या महिला खारघर सेक्टर 13 मधून हिरानंदानी बस स्टॉप येथे रिक्षाने आल्या. पण त्या दागिन्यांची बॅग रिक्षातच विसरल्या. बस स्टॉप ला आल्यानंतर रिक्षा निघून गेल्यावर त्यांच्या हे लक्षात आले.सदर बॅगेत कानातील सोन्याचे कर्णफुले, मंगळसूत्र, मणी, चांदीचे ब्रेसलेट व चांदीचे पायातील जोडवे आणि 4000 रुपये असा ऐवज होता. बॅग रिक्षात विसरले हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना काय करावे ते सुचेना त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
सदर घटनेबाबत पोलीस कॉन्स्टेबल शिंगाडे व पोलीस नाईक जाधव यांना समजले असता त्यांनी त्यांचे तांत्रिक कौशल्य वापरून रिक्षाचालकाचा शोध घेऊन कोपरखैरणे येथे जाऊन बॅग मिळवून महिलेच्या हवाली केली. या प्रामाणिकपणा मुळे पोलीस कर्मचारी यांचे सर्व स्तरातुन कौतुक केल जात आहे.


