खावटी योजनेच्या अंतर्गत नेवासा तालुक्यात १७५९ आदिवासी कुटुंबांना ७० लाखाचे अनुदान प्राप्त - सौ.सुनीताताई गडाख..!!
प्रतिनिधी, मोहन शेगर
सोनई- आदिवासी बांधवांसाठी खावटी योजनेच्या अंतर्गत अन्नदान व किराणा किट वाटपाचा शुभारंभ सौ.सुनीताताई गडाख यांच्या हस्ते करण्यात आला.
नामदार शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरल्यामुळे २०१४ पासून बंद पडलेली खावटी अनुदान योजना मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात पुन्हा सुरू झाली असून नामदार शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्यामुळे नेवासा तालुक्यातील १७५९ आदिवासी कुटुंबांना ७० लाखाचे अनुदान मिळाले असल्याची माहिती सौ.सुनीताताई गडाख यांनी यावेळी बोलताना दिली.
नेवासा येथे खावटी अनुदान योजनेतील अन्नधान्य व किराणा किट वाटपाचा शुभारंभ नेवासा व सोनई येथील मुलींच्या शासकीय वसतिगृह प्रांगणात सौ.सुनीताताई गडाख यांच्या हस्ते बुधवारी दि.२८जुलै रोजी करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी मुळा कारखान्याचे अध्यक्ष कडुबाळ कर्डीले,जिल्हा परिषदेचे सदस्य तुकाराम शेंडे, पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी शेखर शेलार,मार्केट कमिटीचे सभापती डॉ.शिवाजी शिंदे,एकलव्य संघटनेचे शिवाजी गांगुर्डे, नानासाहेब बर्डे,अरुण माळी,रामकृष्ण कांगुणे नगरसेवक जितेंद्र कु-हे,एकनाथ धानापुणे,गोरक्षनाथ तनपुरे,पारधी समाज संघटनेच्या अध्यक्षा मंगलताई चव्हाण यावेळी उपस्थित होते.
यावेळी आदिवासी समाजाचे जनक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाच्याद्वारे करण्यात आले.योजनेचे सहायक प्रकल्प अधिकारी सुनील बारसे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्तविकात योजनांची सविस्तर माहिती दिली.
या योजनेविषयी अधिक माहिती देतांना सौ.गडाख नेवासा तालुक्यातील १७५९ कुटुंब खावटी योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र ठरली आहेत.या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाच्या बँक खात्यात दोन हजार रुपये यापुर्वीच जमा झाले असून दोन हजार रुपये किंमतीचे १९ किलो वजनाचे जीवनावश्यक वस्तूंचे किट लाभार्थी कुटुंबांना देण्यात येणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कोरोना संसर्गाचे दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी राज्यातील जनतेचा रोजी-रोटीचा विचार करून हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी व कोरोना काळात शेतमजुर व इतरांचा रोजगार बंद होणार असल्याने त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपुर्ण निर्णय घेतला होता व त्यासाठी सुमारे ५४००/- कोटी रुपयांचे पॅकेजची घोषणा केली होती.त्याची आज झालेल्या कार्यक्रमामुळे त्याची अंमलबजावणी झाली असल्याचे सौ. सुनीताताई गडाख यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबासाठी ही १०० % अनुदानित योजना असून यामध्ये अनुसूचित जमातीच्या,आदिवासी समाजातील परित्यक्त्या, घटस्फोटीत महिला, वनहक्क धारक कुटुंब, भुमिहीन शेतमजूर, मनरेगा, दिव्यांग विधवा महिला व पारधी अशा कुटुंबांचा समावेश असून उपेक्षित आदिवासी कुटुंबाच्या उत्कर्षासाठी नामदार गडाख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांचा लाभ मिळवून देऊ अशी ग्वाही सौ.सुनीताताई गडाख यांनी यावेळी बोलतांना दिली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते डॉ.रेवणनाथ पवार यांनी केले
तर प्रकल्पाचे दत्तात्रय लष्कर यांनी आभार मानले.
अनुसूचित जमातीच्या जास्तीत-जास्त कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून नामदार शंकरराव गडाख पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे नेवासा तालुक्यातील १७६१ कुटुंबास रुपये ७०/- लाख रुपयांच्या भरीव मदतीपैकी रोख स्वरूपात देण्यात येणारी अनुदानाची रक्कम प्रती कुटुंब रुपये २०००/- प्रमाणे लाभार्थींचे बॅंक खात्यावर जमा झालेली आहे.

