ग्रामसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता या आपल्या ग्रंथातून सामाजिक पर्यावरण रक्षणासाठी गावांची सुधारणा होणे आवश्यक आहे यासाठी पुढीलप्रमाणे वर्णन केलेले आहे.
गावावर आली गुंडांची धाड
विद्यार्थी दारे लावती धडाधड
वाडवडिलांच्या अब्रुची धिंड
काय शिक्षण कामाचे ।।
म्हणुनी पाहिजेत बलवान मुले
कुस्ती मल्लखांब खेळणारे
धडाडीने प्रतिकाराची सजले
तरीच शिक्षण उपयोगी ।।
ऋषिकालीं ऐसी प्रथा
शिक्षणात होती जीवन संस्था
याकरिता आश्रमांची व्यवस्था
होती पूर्वी ।।
धनुर्विद्या मल्लविद्या
आयुर्वेद आणि शस्त्रास्त्रविद्या
उत्तमोत्तम चौदा विद्या
शिकवीत होते आचार्य ।।
चित्रकला चर्मकला
रांगोळ्यांचीही उत्तम कला
बुरडकामे कुंभारकामाददि सकला
चौसष्टकला नानापरी ।।
संगीत शास्त्र स्वयंपाक शास्त्र
गृह स्थापनेचे सुंदर तंत्र
अश्वपरीक्षा रत्न परीक्षादि समग्र
जीवंविद्या शिक्षणी ।।
ऐसी प्रथा पूर्वी होती
आता उच्च ज्ञान घेवोनि येती
परी गावची न सुधारवे शेती
गावच्या उपलब्ध साधनांनी ।।
शिक्षण झाले वैभव स्थानी
मग गावचे जीवन न बसे मनी
उच्च ज्ञान आणावे साध्या जीवनी
कैसे तेही कळेना ।।
त्यापेक्षा उच्च ज्ञानाची विद्यालये
गावीच आणावी निश्चये
जी ग्रामजीवन सजवितील चातुर्ये
शिकवोनि जना ।।
मुलांना शिकवाव्या नाना कला
चापल्य, ध्येयनिष्ठादि सकला
गावचि सांभाळू शकेल आपुला
ऐसे द्यावे शिक्षण ।।
गावासि कैसे आदर्श करावे
याचेचि प्रशिक्षण प्रामुख्ये द्यावे
सक्रियतेने करावयासि लावावे
विद्यार्जनी।।
सहकार्याची प्रबळ भावना
हेचि शिक्षणाचे मुख्य सूत्र जाणा
सहकार्यावाचोनि शिक्षणा
महत्त्व नाही ।।
व्हावे परस्परांशी पूरक
हेचि आहे शिक्षणाचे कौतुक
व्यक्तिनिष्ठेविण भयाण दुःख
मानव- जीवनी ।।
जनसेवेचे प्रमाणपत्र
त्यासि महत्त्व यावे सर्वत्र
उद्याचे राष्ट्र आजचे कन्या-पुत्र
समजुनी त्यांना सुधारावे ।।
गावचे सर्वात मुख्य पुत्र धन
त्यांचे संरक्षावे चारित्रधन
तेणे गावाचे वाढेल महिमान
चारित्र्यापरि उज्वल ।।
आपणासि वाटे जैसे गाव व्हावे
तैसेचि बालकांना शिकवावे
शहाणे करून सोडावे
विद्याशिक्षणे सर्वची ।।
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान

