(जपान )टोकीयो :-नीरज चोप्राने टोकीयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करत भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमधलं हे एकमेव सुवर्ण पदक आहे. भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने आतापर्यंत सात पदके जिंकली आहेत.
नीरजसह 12 स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), ॲम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते. नीरजने पहिल्या प्रयत्नात 87.03, दुसऱ्या प्रयत्नात 87.57, तिसऱ्या प्रयत्नात 76.97 मिटर लांब भाला फेकला. नीरजचा चौथा आणि पाचवा प्रयत्न फाऊल झाला.
नीरज चोप्राच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान यांच्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नीरज चोप्रा यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, आजचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा ठरला असून याआधी कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली.

