प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
इंदापूर: ( दि.९ ) :इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर 1 गावात व तालुक्यात इतर ठिकाणी शासनाची बंदी असलेल्या मांगुर माशाचे बेकायदेशीर उत्पादन बंद करण्यात यावे अशी मागणी इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष श्री ब्रह्मदेव सपकळ व युवा नेते गोविंद पाडुळे यांनी केली.
यावेळी सपकाळ म्हणाले की मांगुर मासा खाण्यास अपायकारक व आरोग्यास हानिकारक आहे. या माश्यामुळे मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहे.असा निष्कर्ष शासनाने काढून यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. असे असतानाही मांगूर व्यावसायिक परप्रांतियांना हाताला धरून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहेत.
मांगूर माशाला लागणारे खाद्य मृत कोंबड्यांचे वेस्टेज व जनावरांचे मटण टाकण्यात येते त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी होत आहे. पाण्याचे व हवेचे प्रदूषण वाढले आहे.फिरस्त्या कुत्र्याचा यावर निर्वाह करून सुळसुळाट झालेला आहे .या कुत्र्यांमुळे मानवी व प्राणी जीवनाला धोका निर्माण झाला आहे.
मत्स्य विभाग यावर गप्प आहे .वेळोवेळी कारवाई करूनही मांगुर माशाचे उत्पादन बेधडकपणे सुरू आहे ,यावरून असे वाटते की मंगुर उत्पादक व मत्स्य विभागाचे अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध जोपासले जात आहेत का? यामुळे मोठी महामारी मानवी जीवनास धोका निर्माण करू शकते का असा प्रश्न निर्माण होत आहे. हा व्यवसाय वेळेत बंद नाही झाला तर याच्या विरोधात आम्हाला आंदोलने करून न्याय मागावा लागेल असे श्री .ब्रह्मदेव सपकाळ यांनी सांगितले ..
तसेच या बाबत मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनाही निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

