नीरा-भीमा कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची विस्तारवाढ - हर्षवर्धन पाटील
- 23 वी ऑनलाईन वार्षिक सभा उत्साहात
फोटो:- निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या 23 व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
इंदापूर: प्रतिनिधी दि.25/9/21
केंद्र शासनाचे इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचे धोरण असल्याने साखर उद्योगाला इथेनॉलचा मोठा आधार मिळत आहे. त्यामुळे कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची क्षमता प्रतिदिनी 30000 KLPD वरून 105000 KLPD करणेसाठी विस्तारवाढ केली जाणार आहे. त्याकरिता प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळाली असून लवकरच विस्तारीकरणाचे काम सुरू होईल, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.25) दिली.
शहाजीनगर (ता.इंदापूर ) येथिल निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची सन 2020-21 वर्षाची 23 वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या शहाजीराव पाटील सभागृहामध्ये आज उत्साहात पार पडली. या सभेत सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते. यावेळी सभेत मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.
चालु गळीत हंगामापासून कारखाना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने बायो सीएनजी गॅस निर्मितीचा देशातील सहकारी तत्त्वावरील पहिला महत्वकांक्षी प्रकल्प सुरु करीत आहे. सदर प्रकल्प देशात आदर्शवत असा असणार आहे, अशी माहिती देऊन हर्षवर्धन पाटील यांनी नीरा-भीमा कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.
कारखान्याने अहवाल 2020-21 वर्षात 5, 59, 796 मे.टन उसाचे गाळप करून 4, 89, 803 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा 10.27 मिळाला आहे. तर सहवीज निर्मिती प्रकल्पातून 4, 66, 30, 363 युनिट उत्पादन घेऊन 2, 80, 33, 200 युनिट वीज विक्री केली आहे. तसेच इथेनॉल प्रकल्पातून 1, 08, 02, 779 लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. त्याचप्रमाणे कृषिरत्न सेंद्रिय खताच्या 51000 बॅगची निर्मिती करण्यात आली आहे. कारखान्याची ऊसाची एफ.आर.पी. रक्कम रु. 2269/- असून आजअखेर रु. 2150 /- रक्कम अदा केली आहे. उर्वरित देय रक्कम रु. 119 लवकरच अदा केली जाईल,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
कारखान्याचे चालू वर्षीच्या गळीत हंगामापासून ऊस वाहतुकीचे 250 ट्रॅक्टर सीएनजी गॅसवर चालविण्यात येणार आहेत. साखर उद्योगासाठी हे क्रांतीकारक पाऊल आहे. त्यामुळे इंधन खर्चात 50 टक्के पर्यंत बचत होईल. आगामी गळीत हंगामात कारखाना 7 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार आहे. इथेनॉलचे 1 कोटी 75 लाख लिटर निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात सांगितले.
यावेळी सभेचे व कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांचे भाषण झाले. या सभेस विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, राजवर्धन पाटील, किरण पाटील, अँड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, माणिकराव खाडे, गोविंद रणवरे, युवराज रणमोडे उपस्थित होते. सभेत विषयांचे वाचन कार्यकारी संचालक डी.एन.मरकड यांनी केले. आभार उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी मानले.
* चौकट :-
=====
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत !
----------------------------------------------------
केंद्र सरकारने 5 वर्षाचे इथेनॉल अतिशय चांगले धोरण जाहीर केले आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करणारा ठरवा मंजूर सभेत मंजूर करण्यात आला. तसेच देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून निवड झाले बद्दल अमित शाह यांचेही अभिनंदन करणारा ठराव सभेत संमत करण्यात आला.
______________________________

