अहमदनगर दि. 24 :-जिल्हयातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार दिनांक 25 सप्टेंबर 2021रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोरोना नियमावलीचे पालन करुन अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी होऊन न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. सुधाकर यार्लगड्डा यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे सुचनेनुसार आयोजित या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखल पूर्व व प्रलंबीत प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. सदरचे लोकअदालत आभासी पध्दतीव्दारे देखील आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानुसार बरीच प्रकरणे आभासी पध्दतीने हाताळण्यात येतील, तसेच प्रत्यक्ष उपस्थित होणा-या लोकअदालतीमध्ये देखील ब-याच पक्षकारांना उपस्थित राहण्याबाबत आभासी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे.
अहमदनगर जिल्हा मुख्यालयासह जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फौजदारी, एन.आय.ॲक्ट ची प्रकरणे, बँकेची कर्ज वसूली प्रकरणे,मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्याखालील प्रकरणे, कौटुंबिक वादांची प्रकरणे,इलेक्ट्रीसिटी ॲक्टची समझोता प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपुर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.
पक्षकारांनी आपसी समझोत्याकरीता ठेवुन ती सामंजस्याने सोडविण्याबाबचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा व सचिव रेवती देशपांडे यांनी केले आहे. ज्या नागरीकांना आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नगर न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

