पर्यावरण जनजागरणाच्यादृष्टीने नक्षत्रवनाचा विचार करता कुंभ राशीतील शततारका या नक्षत्राचा आराध्यवृक्ष कळंब आहे. शततारका म्हणजे शंभर ताऱ्यांचे नक्षत्र.पानझड होणारा हा वृक्ष सदाहरित वनात तसेच पानझडीच्या वनात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, पश्चिम घाट विदर्भ या भागात आढळतो. या वृक्षाची पानझड एप्रिल मे महिन्यात होते व नंतर हिरवट पोपटी रंगाची पाने येतात.या झाडाला पांढरट, पिवळी सुगंधित१.३ सेंटीमीटर लांबीची फुले जून जुलैमध्ये येतात.
या वृक्षाची फळे गोलाकार असलेली तसेच वरून दहा शिरा असलेली अशी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येतात.
कळंब वृक्षाच्या सालीमध्ये सिंकोटॅनिक ॲसिड असते. संपूर्ण झाड विषनाशक आहे. कळंबाच्या पानाचा लेप सुजेवर लावतात. सालीचे चूर्ण जिरे व साखरेसह घेतल्यास ओकारी थांबते. कळंबाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या करून मुखरोग बरा होतो.
कदम्ब या नावाचा दुसरा एक वृक्ष निव म्हणून ओळखला जातो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. याचा विस्तार प्रचंड असतो. फळे गोड, आंबूस, शक्तिवर्धक ज्वरनाशक, वेदना थांबवणारी असतात. यामध्ये ऍस्पिरिन हे द्रव्य असते. नदीकिनारी हा वृक्ष असला की पाण्यातील विषारी द्रवे नष्ट होतात. याची पाने लांबरुंद असतात व वेदना ,सूज यासाठी बांधतात. स्तन्यवर्धनासाठी या फळाचा रस वापरतात. त्वचारोगावर याच्या सालीचा लेप लावतात.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान..!

