गलांडवाडी नं. २ येथील तुकाराम राऊत यांनी पेरुच्या बागेतून मिळवले दहा टनांचे उत्पादन.
इंदापूर प्रतिनिधी:(४ ऑक्टोबर २०२१)तालुक्यातील गलांडवाडी नं.२ येथील शेतकरी तुकाराम राऊत यांनी माळरानावर कष्टाने पेरुची बाग फुलवून आठ ते दहा टनांचे उत्पादन घेतले.
यावेळी बोलताना तुकाराम राऊत म्हणाले, शेतामध्ये सुरुवातीला उभी-आडवी नांगरट केली. त्यानंतर दोन वेळेस फणपाळी करुन दोनदा रोटावेटर मारुन जमिनीची मशागत केली.
व्हीएनआर छत्तीसगड च्या पेरुच्या जातीच्या रोपांची खरेदी केली. शेतात बेड तयार करुन ड्रीप अंथरुन १२×८ वर रोपांची लागवड केली.
ते पुढे म्हणाले की, १४ महिन्यानंतर बागेची छाटणी केली. बागेला पाच ते सहा ट्रेलर शेणखत टाकले. त्यानंतर बागेने बहर धरला. फलधारणा झाल्यानंतर १५० ते २०० ग्रॅम पर्यंतचा पेरु झाल्यावर बागेमध्ये अळी,तुडतुडे,माश्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फळाला प्लास्टिक पिशवीचे आवरण लावले.
सेंद्रीय खताबरोबरच रासायनिक खते वापरली. आठ ते दहा दिवसाला औषधांची बागेत फवारणी केली.
एका झाडाला साधारणतः ३० ते ४० फळे मिळाली. पहिल्या तोड्यास ७ ते ८ टन माल निघाला. या मालास ५० ते ५२ रुपये दर मिळाला असल्याचे राऊत म्हणाले.
सध्या बागेमध्ये वीस ते पंचवीस टन फळ झाडावर आहे. सर्व उत्पादन खर्च वजा जाता या पेरु शेतीतून दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा तुकाराम राऊत यांनी व्यक्त केली.

