शिर्डी । प्रतिनिधी :- नगरपंचायतीच्या वार्ड नंबर १४ मध्ये ज्या उमेदवारांना आगामी निवडणूक लढवायची आहे त्यांनी जनतेचे अगोदर कामे करावीत. ते निवडून आल्यानंतर मी पहिला त्यांचा सत्कार करणार आहे. तोपर्यंत ठेकेदाराला वेठीस धरून गणेशवाडीतील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण होऊ द्यावे, असे आवाहान वार्ड क्रमांक १४ मधील शिर्डी नगरपंचायतचे मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी केले.
नगरसेवक कोते
प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, मी या वार्डात निवडून आल्यानंतर येथील सर्व रस्त्यांची ड्रेनेजची, पिण्याच्या पाण्याची कामे तातडीने मंजूर करून पूर्णत्वास नेले. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी विखे पाटील गटात सामील झालो. मात्र दीड वर्षापासून गणेशवाडीतील मुख्य रस्ता ज्याला तेरा गल्यातील रस्ते जोडलेले आहे त्या रोडचे काम निवडून आल्यानंतर लगेच जानेवारी मध्ये डांबरीकरण केले. मात्र त्यानंतर या भागात रहिवासी संख्या तसेच वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रोडचे काम १८ फूट व्हावे यासाठी प्रयत्न केले. त्यास मंजुरी देण्यात आली तसेच ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
दि. ३१ मार्च २०२१ रोजी या रस्त्याचे टेंडर झाले असून डायमंड कन्स्ट्रक्शन यांना ते मिळाले. आणि १२ जून २०२१ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली. मात्र जेव्हापासून वर्क ऑर्डर दिली तेव्हापासून काम सुरू व्हायला पाहिजे होते, परंतु ठेकेदाराच्या विलंबामुळे भर पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
यामध्ये खरी परिस्थिती वेगळे असून यात आगामी काळात येणाऱ्या शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीत ज्याला कोणाला उभे राहायचे आहे त्याने अशा कुरघोड्या कराव्यात मात्र जनतेचे कामे करून, जनतेला वेठीस धरू नव्हे, असा उपरोधिक टोला नाव न घेता लगावला आहे. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे १ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता सुरू झाले, परंतु विकासाच्या आड येणाऱ्या एका व्यक्तीने ठेकेदाराला दमबाजी करून काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप कोते यांनी केला आहे. ठेकेदाराने कोणाच्या दबावाला, धमक्यांना बळी पडू नये. पोलीस बंदोबस्तात सदर रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल मात्र ही वेळ येऊ देऊ नका, असा सूचक इशाराही कोते यांनी दिला.

