जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हॅटसॲप - ९७६८४२५७५७
मुंबई:- देशातील आणि राज्यातील राजकारणाची पातळी ज्या पद्धतीने खाली घसरली आहे ते धक्कादायक आहे. सरकारी यंत्रणांचा अयोग्य वापर करत एखाद्याचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपला काही नवीन नाही ते त्यांच्या रक्तातच आहे पण या व्यक्तीवरचा राग म्हणून त्याच्या कुटुंबाला, बहिणींना त्रास देण्याची ही कुठली पद्धत, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर,ऑफिसमध्ये आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. त्याचा निषेध नोंदवत अजितदादा पवार या भाजपच्या कृतीची परतफेड करतील. एखादी व्यक्ती आपल्या यंत्रणेला जुमानत नाही, आपल्या पक्षाला जुमानत नाही तेंव्हा त्याच्या कुटुंबातील महिलांना टार्गेट करून त्या व्यक्तीला हार मानायला लावणार असाल तर लक्षात ठेवा की ते अजितदादा पवार आहेत, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
अजितदादा पवार कधीच हारणार नाहीत. माणूस स्वतःवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करेल परंतु यामध्ये विनाकारण घरातील महिलांना मधे ओढून यातून राजकारण करत असेल तर दादा ते व्याजासकट याचा हिशोब चुकता करतील, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

