शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक २० नोव्हेंबर २०२१
मुंबई : गेल्या साधारण वर्षभरापासून दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आल्याचं दिसून येत आहे. आज सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. तसंच मोदींनी शेतकऱ्यांना आपलं आंदोलन मागे घेण्याचं आवाहनही केलं आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. ‘झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए… अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली आहे.
मोदी सरकार अखेर झुकलं, वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा....
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी या निर्णयाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “आदरणीय मोदीजींनी लोकांना संबोधित केलं, आपल्या कामांची माहिती दिली आणि घोषणा केली की तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात आले आहेत. आजपासून हे तिन्ही कायदे देशात राहणार नाहीत. सगळ्यात आधी मी सर्व शेतकरी बांधवांचं अभिनंदन करतो, जे गेल्या वर्षभरापासून आपल्या मागण्यांवर ठाम राहिले, कितीही प्रयत्न केले तरी ते मागे हटले नाहीत, त्यांच्यावर लाठीचार्ज केला, आतंकवादी असल्याचा आरोप केला पण तरीही त्यांनी सात वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारला झुकवण्याचं काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की, झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए…”. अशी सूचक प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.
‘तरीही दोन्ही राज्यांत भाजपच हरणार’....
दरम्यान, पुढे बोलतांना नवाब मलिक म्हणाले की, ‘उत्तर प्रदेश व पंजाबमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या निमित्तानं का होईना, हा निर्णय झाला हे महत्त्वाचं आहे. अर्थात, दोन्ही राज्यांत भाजप हरणारच आहे याची आम्हाला खात्री आहे, असंही मलिक म्हणाले. ‘मोदी सरकारची मनमानी आता चालणार नाही हा संदेश शेतकऱ्यांच्या लढ्यानं देशाला दिला आहे. यापुढं देखील देशात काही चुकीचं घडत असेल तर त्या विरोधात ठामपणे उभं राहा, विजय निश्चित आहे, असं आवाहन मलिक यांनी जनतेला केलं आहे
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

