शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १५ डिसेंबर २०२१
पश्चिम महाराष्ट्रातील 75 टक्के क्षेत्रावर राहुरी विद्यापीठाच्या भात वाणांची लागवड - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील..!!
अहमदनगर : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या वडगाव मावळ येथील संशोधन केंद्राने भात पिकाचे इंद्रायणी, पवना, कुंडलिका, फुले मावळ व फुले समृध्दी असे विविध वाण आजपर्यंत विकसीत केले आहेत. तसेच भात पिकाच्या 28 उत्पादन विषयक शिफारशी दिलेल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील 75 टक्के क्षेत्रावर इंद्रायणी व फुले समृध्दी या दोन वाणांची लागवड केली जाते. एकट्या इंद्रायणी वाणामुळे प्रति वर्षी कमीत कमी 171 कोटी रुपयांची वाढ शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्नात होते. अशाप्रकारे उल्लेखनीय कार्य केलेल्या या संशोधन केंद्रामुळे भात उत्पादक शेतकर्यांची उत्पादकता वाढण्यात मदत झाली आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी वडगाव मावळ येथील कृषि संशोधन केंद्रास भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी संशोधन केंद्रात होत असलेल्या विविध संशोधन उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी या संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. नरेंद्र काशिद यांनी विद्यापीठीय व अखिल भारतीय समन्वित प्रकल्पातील विविध संशोधन प्रयोग, बिजोत्पादन व विस्तार कार्यक्रम या विषयी सादरीकरण केले.
याप्रसंगी इंद्रायणी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य असलेले चांदखेड येथील प्रगतशील शेतकरी नितीन गायकवाड, जांभुळगाव येथील युवा शेतकरी प्रविण गाडे यांचा भात पिकाची सुधारीत शेती करुन अधिक उत्पादन घेतल्याबद्दल कुलगुरु डॉ. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संशोधन केद्रातील भात पैदासकार डॉ. तुकाराम भोर, वरिष्ठ संशोधन सहा. संदिप कदम व इतर कर्मचारी उपस्थित होते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

