नीरा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ११ कोटी ५० लाख मंजूर - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
इंदापूर (प्रतिनिधी):इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवर असलेल्या सात ठिकाणच्या कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याकरिता तब्बल ११ कोटी ४९ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
तालुक्यातील नीरा नदीवर असलेल्या जांब, चिखली, वालचंदनगर, निमसाखर, खोरोची, बोराटवाडी व पिठेवाडी येथील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यातून पाण्याची गळती होत आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्याच्या तोंडावर बंधारे कोरडेठाक पडत होते.
परिसरातील शेती पिकांना पाण्याची मोठी चणचण भासत होती. दरम्यान या भागातील शेतकऱ्यांकडून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची मागणी होत होती. नीरा नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती पिकवली जात असून तालुक्यातील अर्थकारणावर याचा परिणाम होत होता. शेतकऱ्यांची अडचण ओळखून मंत्री भरणे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून जांब, चिखली व वालचंदनगर येथील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ५८ लाख ६० हजार रुपये तर निमसाखर, खोरोची, बोराटवाडी व पिठेवाडी येथील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ६ कोटी ९० लाख ९० हजार रुपयांचा निधी खासबाब मंजूर करून घेतला आहे.
या निधीतून बंधाऱ्यांच्या मोडकळीस आलेल्या भराव्याच्या दगडी भिंती काढून त्या ठिकाणी कॉक्रिटीकरण करणे, गरजेच्या ठिकाणी बंधाऱ्याचा पाया मजबुतीकरण करणे, पाण्याच्या बाजूकडील अर्धगोलाकार दगडी बांधकाम काढून त्या ठिकाणी कॉक्रिटीकरण करणे आदी कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या बंधाऱ्यामधील पाणीगळती थांबणार असून शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

