इंदापूर : प्रतिनिधी दि.30/1/22
शेतकऱ्याच्या ऊस बिलातून थकीत विज बिलाची वसुली करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयास आमचा विरोध आहे. अशाप्रकारे वीज बिलाची वसुली करणे हे बेकायदेशीर व शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस बिला मधून थकीत वीज बिलाची वसुली होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी दिला आहे.
महाराष्ट्र हे कल्याणकारी राज्य असल्याने महाविकास आघाडी शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून केलेली थकीत वीज बिलाची वसुली चुकीची आहे. त्यामुळे थकीत वीज बिलाची अशा प्रकारे शेतकऱ्याकडून सक्तीने वसुली करण्यास आमचा तीव्र विरोध आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
वास्तविक पाहता शेतकऱ्यांना विजेची बिले अव्वाच्या सव्वा आली आहेत. सदरची चुकीची आलेली कित्येक पट जास्तीची वीज बिले दुरुस्त करून देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी नेहमीच वापरलेल्या विजेची बिले भरलेली आहेत, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. जर शासनाने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून थकीत वीज बिल वसुलीचा तगादा लावला, तर राज्यामध्ये भाजपतर्फे आंदोलन केले जाईल, असा स्पष्ट इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.
______________________________
.

