वाद कोर्टापर्यंत न जाता गाव पातळीवरच सोडविण्यासाठी प्रयत्न करणार - राजेंद्र सानप
टाकळी काझी : २ / नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे दि . २९ डिसेंबर रोजी झालेल्या काँग्रेस मेळाव्यात नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहा .पो. नि . राजेंद्र अशोक सानप यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहा .पो. नि . राजेंद्र सानप यांनी चाळीस वर्षांपासून अडवलेला मेहेकरी येथील रस्ता वाहतुकीसाठी खुला केला . तसेच शेतकऱ्यांचे जुने वाद , भाऊबंदकी,बांधावरून होणारे वाद त्यांच्यात तडजोडीने व सामंजस्याने मिटविले आहेत . त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ना.थोरात यांच्यासह आ. लहू कानडे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी मनपा विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी सहा.पो. नि . राजेंद्र सानप यांनी सांगितले की , शेतकऱ्यांच्या शेतीचे वाद , रस्त्याचे वाद , भाऊ बंदकीचे वाद तसेच दिवाणी वाद हे गाव पातळीवरच मिटविले गेले पाहिजेत . कोणतेही वाद हे कोर्टापर्यंत न जाता ते गाव पातळीवरच सोडविले गेले पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू असेही त्यांनी सांगितले .

