साईबाबांच्या ज्या भाविकांना परवडेल अशांकडून बाबा नेहमी दक्षिणा वसूल करत. हा प्रकार ते दुहेरी उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून करत असत. एक म्हणजे ज्या कुणाला ते केवळ ऐहिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा असेल अशांना चार हात दूर ठेवणे व दुसरे म्हणजे ज्या कुणाची आध्यात्मिक शिक्षण प्राप्त करण्याची योग्यता असेल त्यांना ते शिक्षण देणे. १९०८ साली बाबांनी सर्वात प्रथम ही दक्षिणा वसूल करण्याची प्रथा सुरू केली. त्यांच्या भेटीसाठी जे भक्त येत त्यांच्याकडे बाबा दोन रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत दक्षिणा मागत. ज्या ज्या लोकांकडे ते दक्षिणा मागत त्यांच्यापैकी जवळजवळ सर्वजण ती देत.
काही लोक आपण होऊन पैसे पाठवत. एका भाविकाने तर ६००० रुपये पाठवले होते. दरदिवशी देणगीपोटी जमा होणारी रक्कम प्रचंड मोठी असे. कधीकधी एका दिवसात हजारो रुपये जमा होत. संपूर्ण मिळकत गव्हर्नरच्या पगाराएवढी निश्चितच असे. त्यावर सरकार कर वसूल करू शकेल एवढी असे. पण बाबा त्यापैकी एक पै सुद्धा स्वत:कडे ठेवत नसत. जमा झालेल्या पैशाची विल्हेवाट ज्या त्या दिवशीच लावण्यात येई. बाबा रोज दोनशे भिकाऱ्यांना जेऊ घालत. ज्यांना ज्यांना बाबांनी दान दिलं ते पुढे चांगले श्रीमंत झाले व त्यांनी पुढे जमीनजुमला विकत घेतला व ते आयकरही भरू लागले. पण बाबांच्या देह सोडते समयी मात्र त्यांच्या खिशात केवळ सोळा रुपये होते व त्यांनी स्वतःच्या अंत्यसंस्कारासाठी ते ठेवले होते. बाबांना धनाची किंचितही आसक्ती नव्हती. त्यांच्या बऱ्याचशा दैनंदिन गरजा त्यांच्या भिक्षा मागण्याच्या धर्मातूनच पुऱ्या होत. ते रोज भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडत. ते रोज पाच घरांच्या समोर उभं राहून हाळी घालत, "पोरा, पोरी, रोटी-दाल ला दो.”
- देव जो भूवरी चालीला पुस्तकातून

