कोपरे (राहुरी) दि. १६ मार्च
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मुसळवाडी तलावातून नऊ गावांना जाणारी पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करा अन्यथा प्रहार स्टाईल आंदोलन उभारले जाईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी दिला.
राहुरी तालुक्यातील कोपरे शेनवडगाव गावातील महिलांनी पिण्याची पाणी योजना बंद असल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी तेथील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कोंडून घेण्याचे आंदोलन केलेने आप्पासाहेब ढुस यांनी कोपरे गावाला भेट देऊन या महिलांची व्यथा जाणून घेतली, त्या प्रसंगी आप्पासाहेब ढुस बोलत होते.
या प्रसंगी कोपरे येथील नानासाहेब जाधव, लक्ष्मण जगताप, साहेबराव जगताप, सतीश साठे, नानासाहेब जगताप, किशोर टेमक, सचिन क्षीरसागर, अनिल गायकवाड, संतोष जगताप, भगीरथ जगताप, विजय कुमावत, प्रशांत कराळे आदी उपस्थित होते.
कोपरे गावाला प्रहार च्या कार्यकर्त्यांसह भेट देऊन आप्पासाहेब ढुस यांनी या आंदोलनकर्त्यासोबत चर्चा करून माहिती घेतली असता मुसळवाडी, महाडुक सेंटर, मालुंजा, खुडसरगाव, पाथरे, शेणवडगाव, कोपरे, वांजुळपोई, तिळापूर या नऊ गावांना मुसळवाडी धरणातून पाणीपुरवठा करणारी नऊ गाव पाणी पुरवठा योजना गेल्या दीड वर्षा पासून बंद असल्याची माहिती मिळाली. या नऊ गावातील नागरिक दीड वर्षा पासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याने केवळ या योजनेच्या मोटारी नादुरुस्त असल्याने ही योजना बंद असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. त्यामुळे या नऊ गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकंती करण्याची वेळ आली असून त्या सर्व गावातील महिला भगिनींची पाण्यासाठी होणारी परवड थांबविणेसाठी प्रहार जनशक्ती पक्ष या महिलांच्या पाठीशी सर्व ताकदीने उभी राहिल असे या वेळी ढुस यांनी सांगितले.
पुढे बोलताना ढुस म्हणाले की, किरकोळ कारणाने तब्बल दीड वर्ष मुसळवाडी नऊ गाव पाणीपुरवठा योजना बंद राहावी आणि तेथील जनतेचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल व्हावे ही बाब अत्यंत गंभीर असून ही नऊ गाव पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करावी व या नऊ गावातील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरवावा.अन्यथा प्रहार स्टाईल आंदोलन उभारावे लागेल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी राहुरीचे गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

