पाणी म्हणजे जीवन. पण हेच पाणी पिण्याच्या पद्धतीमुळे संपूर्ण सृष्टीचे पर्यावरण धोक्यात येत असेल तर भीक नको पण कुत्रे आवर या न्यायाने पाणी नको पण प्लास्टिक आवर असे म्हणायची वेळ आलेली आहे.
घरातून बाहेर पडणाऱा प्रत्येक माणूस एक तर प्लास्टिकची बाटली विकत घेऊन पाणी पितोय किंवा घरातून प्लास्टिकच्या बाटलीत पाणी भरून ते पाणी पिऊन झाले की पाण्याची बाटली कुठेतरी फेकून देतोय. अशा लाखो बाटल्या रोज या भूतलावर फेकून दिल्या जातात आणि हे प्लास्टिक विघटन न होता अनेक ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत पडलेले आपण पाहतो. यामुळे नद्या नाले तुंबतात.
शहरे, खेडी, गावे, डोंगर, किनारे, पर्यटन स्थळे, शाळा, महाविद्यालये यांचा असा कोणताही मोकळा भूभाग दिसत नाही की जिथे प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच दिसत नाही. अनेकदा जनावरेही प्लास्टिक चघळतात, ते जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचे जीवन धोक्यात येत आहे.
केवळ तहान भागवण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करण्याच्या सवयीपोटी आपण पर्यावरणाचे प्रचंड नुकसान करत आहोत त्याबाबत ज्याचे त्यांने आत्मपरीक्षण करून स्वतःहून स्वतःचे रक्षणाचा मार्ग शोधावा, असा प्रयत्न करावा अशी वेळ येऊन ठेपलेली आहे. अन्यथा पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्यामुळे आपण सृष्टीचा विनाश करीत आहोत हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज भासणार नाही.
पर्यावरण जनजागरण आणि आरोग्य साक्षरता उपक्रमांतर्गत कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या विद्यमाने प्रकाशित.
लेखक :
पुण्यरत्न डॉ.चंद्रकांत शहासने, पुणे
(देशभक्तकोशकार)
मोबाईल क्र : ९८८१३७३५८५

