कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखाना शेतकऱ्यांचा आधारवड - हर्षवर्धन पाटील
- कर्मयोगी परिवार संवाद मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद
- 6 ठिकाणी संवाद मेळावे
- आजअखेर 11 लाख मेट्रिक टन गाळप
फोटो :- बाभुळगाव येथे कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याच्या कर्मयोगी परिवार संवाद मेळाव्यामध्ये रविवारी मार्गदर्शन करताना भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
इंदापूर: प्रतिनिधी दि.3/4/22
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना हा इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आधारवड बनला आहे. गेली 32 ते 33 वर्षात या कारखान्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये आर्थिक संपन्नता येऊन सर्वांगीण प्रगती झाली आहे. आजअखेर चालु गळीत हंगामामध्ये कारखान्याचे 11 लाख मे. टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. कारखान्याने कार्यक्षेत्रातील बिगर नोंदीच्या लाखो टन ऊसाचे गाळप करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.3) बाभुळगाव ( ता. इंदापूर ) येथे काढले.
कर्मयोगी कारखाना कार्यक्षेत्रामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.3 ) दिवसभर 6 ठिकाणी ' कर्मयोगी परिवार संवाद अभियाना ' चे आयोजन करण्यात आले आहे. या संवाद मेळाव्यांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बाभुळगाव सह शिरसोडी, वरकुटे बु., पळसदेव, भिगवण, शेळगाव या ठिकाणी रात्री आठपर्यंत हे मेळावे संपन्न होत आहेत. चालु हंगामात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अद्यापही 30 ते 35 हजार में. टन ऊस शिल्लक असून या सर्व उसाचे गाळप केले जाईल, असे भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, कर्मयोगी कारखान्याने पुढील गळीत हंगामामध्ये 14 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांनी आपल्या सर्व उसाच्या नोंदी कारखान्याकडे द्याव्यात व दिलेल्या नोंदींची पडताळणी करावी. सर्व उसाचे गाळप करण्याची जबाबदारी आम्ही घेतो, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी कारखान्याच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, प्रदीप पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, शारदा पवार, कांचन कदम, कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांचेसह विलासराव वाघमोडे, कांतीलाल झगडे, दत्तात्रय शिर्के, भास्कर गुरगुडे, श्रीमत शिंदे, रवींद्र पाटील, महेंद्र रेडके, अजित खबाले, माऊली वाघमोडे, पंजाबराव गायकवाड, वामनराव सरडे, गोपीचंद गलांडे, दीपक गुरगुडे, अमोलराजे इंगळे तसेच गावोगावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* चौकट :-
देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षात शेतकऱ्यांची एकदाही वीज तोडली नाही- हर्षवर्धन पाटील
------------------------------------
शेती पंपाच्या वीज तोडणी मोहिमेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा उल्लेख करून हर्षवर्धन पाटील म्हणाले, वीज तोडणी मोहिमेच्या काळात इथले नेतृत्व म्हणायचे माझ्या हातात काही नाही, त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. मात्र राष्ट्रीय महामार्गावर आंम्ही आप्पासाहेब जगदाळे, पृथ्वीराज जाचक यांचेसह रास्ता रोको करून वीज जोडण्यास भाग पाडले. भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षात शेतकऱ्यांची एकदाही वीज तोडली नाही. दरम्यान, सध्याच्या तालुक्यातील राजकीय परिस्थितीबद्दल बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, मी अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवले आहेत, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. देशात भाजपचे मजबूत सरकार आहे, इंदापूर तालुक्यासाठी येणारा भविष्यकाळ उज्वल आहे. राज्यात दररोज काय चालले आहे हे तुम्ही बघत आहात.

