शिर्डी । प्रतिनिधी( संजय महाजन ) :-
शिर्डी येथील साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 21 वर्षांपासून दरवर्षी आयोजित करण्यात येणारा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा शिर्डीतील किमया गार्डन येथे शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली, शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत, 23 वधू वरांचे जोडपे आणि त्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नातेवाईकांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात पार पडला.
अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात कैलास बापूंच्या या सामाजिक कार्याचा गौरव करत या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून कैलास बापूंनी आता पर्यंत तब्बल 1900 जोडप्यांना विवाह बंधनात बांधून मोठे पुण्य पदरी पाडून घेतल्याचे सांगत एकप्रकारे विश्व विक्रम केल्याचे गौरवोद्वार काढले. विवाह सोहळ्याच्या वेळी कैलास बापूंचे विदेशात शिक्षण घेतलेले चिरंजीव धनराज कोते यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
कैलासबापू आपल्या भाषणात चिरंजीव धनराजचा उल्लेख करत म्हणाले की कालपासून माझ्या मागे लागला आहे की मला बोलायचे आहे आणि वधू वरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत आपल्या लाडक्या चिरंजीवांच्या या मागणीला बाप्पुंनी प्रत्यक्षात उतरवत शक्यतो नेहमीच आपल्या भाषणात कोणाचाही एकेरी उल्लेख न करता आदरार्थी संबोधत मितभाषी बोलणारे बापू.. आज आपल्या चिरंजीवाला सुद्धा आदरार्थी वाक्याने भाषणाला बोलवत आपल्या सुसंस्कृत बोली भाषेचा प्रत्यय उपस्थितांना दिला. यावेळी बापूंचे भाषण भले भले दिग्गज नेते लक्षपूर्वक ऐकत असतात मात्र आज धनराज कोते बोलत असताना आपल्या चिरंजीवांच्या भाषणाला ऐकण्यासाठी जणू बापूंचे कान आतुर झाले होते. कौतुकाने आपल्या मुलाकडे पाहत भाषणानंतर बापूंनी टाळ्या वाजवत भाषणाचे कौतुक केले.
दरम्यान बापूंच्या पावलावर पाऊल ठेवत धनराज कोतेंच्या सामाजिक कार्याचा श्री गणेश झाल्याची लग्न मंडपात चर्चा होती. अतिशय आनंदात आणि भक्तिमय वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न झाला असून कैलास बापू आणि सुमित्रा काकी यांनी वधू चे कन्यादान करत त्यांना शुभ आशीर्वाद दिले. यावेळी वधू वरांना साईबाबांचे श्री साई सच्चारीत्र आणि पत्रकार प्रमोद आहेर लिखित शिर्डी गॅजेटीयर तसेच गृहपयोगी वस्तूसह मंगळसूत्र भेट देण्यात आले.
आज शिर्डी मध्ये सर्वधर्मसमभाव विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्व वहऱ्हाडी मंडळींना मिष्टान्न भोजन देण्यात आले. मिरवणूक, बँड, मंडप, जेवणावळी, यामुळेच वातावरण शुभमंगल दिसून येत होते. यावेळी अनेक साधुसंत, सर्वधर्मीय मान्यवर उपस्थित होते.

