भक्ती आणि शक्ती यांच्या संतुलित संयुगातून सृजनशीलता आकार घेते. सृजनशीलता हा एक राष्ट्रीय संस्कार आहे. गुणविशेष आहे. शक्ती आणि भक्तीचे कार्य परस्पर पूरक आहे. हे संतुलन बिघडले तर राष्ट्रीय संतुलन बिघडते. केवळ भक्ती, साधना, उपासना,सणवार करत बसलात आणि शक्तीची जोपासना बलवृद्धी करण्यात कूचराई केली तर शरीर रोगट होईल. मन संशयी असेल, अहंकारी असेल तर मन:शक्ती, सामर्थ्य रहाणारी नाही. अशा जगण्याचा उपयोग जसा होत नाही तसाच केवळ अडदांड शक्तीचा मीपणा असेल आणि मनात भक्तीभाव नसेल तर तो अडदांडपणा, ती शक्ती विनाशकारी ठरते.
म्हणूनच छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून भक्ती आणि शक्ती यांचे संतुलन करीत सृजनाच्या वाटेवरती प्रवास करणे म्हणजे राष्ट्रीय पर्यावरण जपणे होय.
या सृजनांच्या वाटेवरचा काव्यस्वाद घेऊ या.
सृजनाच्या वाटेवरती
सृजनाच्या वाटेवरती
मज अनेक श्रोते मिळती
सर्जनता रूळते ओठी
सर्जनता रूजते पोटी...१
सृजनाच्या वाटेवरती
कुणी उगाच हो धडपडती
शंकांचे काहूर पेलत
भोवऱ्यांत ते गरगरती...२
सृजनांची होता गट्टी
मग मना मिळे विश्रांती
मांगल्य,सुखाची प्राप्ती
ही हीच असे संपत्ती...३
ही सृजनशीलता जपणाऱ्यांचा संग
घडवितो मानवा कर्मयोगी नि:संग
राष्ट्रहितार्थ व्रत हे सृजनशीलता घ्यावे
घडवावे वीर शिवाजी-बाजी सारे..४
हे सृजनशीलता पुण्याईचे कर्म
देतसे सर्वदा आनंदी आनंद
जे समाजहिता आचरू या वेगे
जुळवूनी सर्वथा मानवतेचे धागे..५
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या पर्यावरण जनजागरण, राष्ट्रभक्ती आणि आरोग्य साक्षरता मोहिमेत सहभागी होण्यासाठी ९८८१३७३५८५ वर संपर्क करा.
रचनाकार:
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने
(देशभक्तकोशकार), पुणे.

