श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्त्री कर्तृत्वाची जीवनगाथा आजच्या राजकीय,सामाजिक, धार्मिक, सेवाभावी चरित्रगाथा प्रेरणादायी असल्याचे मत माजी तहसीलदार गुलाबराव पादीर यांनी व्यक्त केले.
येथील डावखर मळ्यातील प्रा.शिवाजीराव बारगळ यांच्या निवासस्थानी हॉलमध्ये राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गुलाबराव पादीर बोलत होते. अध्यक्षस्थानी ऍड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके उपस्थित होते.त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.संयोजक प्रा.शिवाजीराव बारगळ यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.प्रमुख पाहुणे गुलाबराव पादीर,माजी प्राचार्य शंकरराव अनारसे,माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे,साहित्य प्रबोधन मंचचे कार्याध्यक्ष स्वामीराज कुलथे,सौ.अरुणाताई बारगळ, सौ.मीराताई पादीर,साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रतिमापूजन केले.प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन लहू कोल्हे (गुरुजी),श्रीरामपूर पंचायत समितीचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी कचरू तुकाराम निंभोरे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.
श्री गुलाबराव पादीर यांनी अहिल्यादेवी होळकर म्हणजे सतीत्व,ममत्व,राजनीतीतज्ञ , समाजसेवी, धर्मवत्सल,कौटुंबिक जिव्हाळा जपणाऱ्या, धाडशी आणि सर्वांना आपलेपणा देणाऱ्या, 'पुण्यश्लोक'या उपाधीने लोकप्रिय असणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श जपला पाहजे असे सांगितले.प्राचार्य अनारसे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी आणि राजकीय स्त्रीकर्तृत्वाचा प्रेरणादायी चरित्र इतिहास वाचला पाहिजे असे आवाहन केले .
प्राचार्य डॉ. गागरे यांनी राजमाता अहिल्याबाईंच्या बालपणातील चरित्रकथा सांगितल्या, स्वामीराज कुलथे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केलेले रस्ते, पाणी, झाडे आजही प्रेरणादायी आहे, हा इतिहास जपला पाहिजे. घरातील स्त्रीला सन्मामाने वागविणे हीच खरी राजमाता अहिल्यादेवीचे पूजन होय.अध्यक्ष भाषणात प्राचार्य शेळके यांनी राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासचरित्रातून समाजसेवा आणि राजकारण यांचे आदर्श दिसतात ते प्रेरणादायी आहे असे सांगितले.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी जाती, धर्मांच्या पलीकडे जाऊन इतिहास घडविणाऱ्यांचा आदर्श जपला पाहिजे, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सर्वांना जपले, सर्व आपले आहे असे मानले.असा इतिहास सांगून सूत्रसंचालन केले तर सौ.अरुणाताई बारगळ यांनी आभार मानले.

