*शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना पेढा भरवत केला आनंद साजरा
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढण्याच्या मागणीसाठी सुद्धा पाठपुरावा करणार - काळे
अहमदनगर प्रतिनिधी :-
खाजगी हॉटेल व्यवसायिक आणि मनपा यांच्यातील आंबेडकर पुतळ्याच्या जागे संदर्भातील वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ही जागा महापालिकेची असल्याबाबतचा निर्णय दिल्यानंतर शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून एकच जल्लोष केला. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना पेढा भरवत चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. दहा किलो पेढ्यांचे यावेळी वाटप करण्यात आले.
✊🏻 डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याची गेल्या अनेक वर्षांपासून चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी आहे. काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाच्या वतीने देखील यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या शहर काँग्रेसच्या मेळाव्या मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढण्याची मागणी किरण काळे यांनी केली होती. यावेळी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते तसेच त्रिसरण सामाजिक बहुउद्देशीय प्रतिष्ठान, न्यू पॅंथर ग्रुप यांच्या शिष्टमंडळाने काळे यांच्यासह आ. थोरात यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते.
काळे म्हणाले की,* भीमसैनिकांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण होत आहे. आता लवकरात लवकर पूर्णाकृती पुतळा जेव्हा उभा राहील तेव्हा खऱ्या अर्थाने भीमसैनिकांना न्याय मिळेल. आज देशाचे संविधान संकटात असताना डॉ.आंबेडकरांचे विचारच या देशाला अखंड आणि एकत्र ठेवू शकतात. त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यामुळे समाजाला सातत्याने एकतेचा संदेश देणाऱ्या संविधानाची प्रेरणा ही निश्चितपणे मिळत राहील. अशाच प्रकारे शिवप्रेमींची देखील मागणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माळीवाडा स्टॅंड येथील पुतळ्याची उंची ही उड्डाणपुलापेक्षा मोठी करण्याची देखील शिवप्रेमीसह काँग्रेस पक्षाची मागणी आहे. त्यासाठी पुढील काळात आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
नाथा अल्हाट म्हणाले की, भीमसैनिकांनी या न्यायालीन लढाईमध्ये मोठा संयम बाळगला. बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्याचा उपयोग न्याय मिळण्यासाठी चळवळीच्या कार्यकर्त्यांना करावा लागला. अखेर न्यायालयाने भीमसैनिकांना न्याय दिल्याचा आनंद आहे. संतोष जाधव म्हणाले की, लढाई अजून बाकी आहे. न्यायालयाचा निकाल जरी लागला असला तरी देखील प्रत्यक्षात पूर्णाकृती पुतळ्याचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करत राहणार आहोत.
💁🏻♀️ महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीताई साठे म्हणाल्या की, नगर शहराची भूमी ही डॉ. आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठीचा मार्ग मोकळा होण्यासाठी एवढ्या वर्षांची प्रतीक्षा आम्हाला करावी लागली. मात्र आता भव्यदिव्य पूर्णाकृती पुतळा लवकर उभा करणे हे समाजाचे एकमेव उद्दिष्ट आहे.
यावेळी काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा अल्हाट, आंबेडकरी चळवळीचे संतोष जाधव, उमेश साठे, आकाश गायकवाड, किशोर कांबळे, गौरव कसबे, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, सुधीर पानपाटील, अर्चना गायकवाड, राम गायकवाड, कुशाभाऊ भिंगारदिवे, महादेव भिंगारदिवे, अविनाश अवघडे, विनोद दिवटे, अमित गायकवाड, सावेडी काँग्रेसचे विभाग प्रमुख अभिनव गायकवाड, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, माजी नगरसेवक फैयाज शेख, महासचिव इम्रान बागवान, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषा भगत, ज्योती साठे, पै. दीपक जपकर, राजू साळवे आदींसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

