रमेश जेठे (सर) अहमदनगर :-
आपल्या देशात अनेक जाती- धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात हे परस्पर प्रेम, बंधूभाव व सद्भावना आणखी वृध्दिंगत करण्याच्या उदात्त हेतूने जमाते इस्लामे हिंद,जमियते उलमाये हिंद, सद्भवाना मंच यांच्यावतीने रविवार दि.२ ऑक्टोबर २०२२ रोजी दु. 3 वा., अहमदनगर येथील सैनिक लॉन, (जुने कलेक्टर ऑफिस शेजारी) मध्ये ‘धर्म सद्भावना संमेलना’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जमीयते उलमा ए हिंदचे जिल्हाध्यक्ष मौलाना इर्शादुलाह कासमी मखदुमी यांनी दिली आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मौलाना अब्दुल रऊफ आलमगीरी,सय्यद खलील अ.करीम,शहर उपाध्यक्ष निसार बागवान, जनरल सेक्रेटरी सय्यद अमीर, प्रसिद्धि प्रमुख सय्यद अकबर,जमाते इस्लामी हिंदचे मुबीन ख़ान आदि उपस्थित होते.
२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या संमेलनात ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपूरे, कुंदन ऋषिजी महाराज म. सा., मौलाना नदीम सिद्दीकी,पोलिस अधिक्षक मनोज पाटील, ह.भ.प. अजय महाराज बारस्कर,फादर ब्रिस्टन ब्रिटो, भाई ग्यानी पदमसिंहजी खालसा, भिक्खु प्रज्ञशील, हरीष खूबचंदानी (निरंकारी), माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे, संतोष पवार आदि मार्गदर्शन करणार आहेत.
या विषयी अधिक माहिती देतांना डॉ.रफिक सय्यद म्हणाले, पवित्र कुरआन मध्ये अखिल मानव जातीला उद्देशून म्हटले आहे, लोकांनो,आम्ही तुम्हाला एकच पुरुष व एकाच स्त्री पासून निर्माण केले आहे. मग तुमच्या भावक्या व कबिले बनविले जेणे करून तुम्ही एकमेकांना ओळखावे. तुम्हांपैकी अल्लाह जवळ श्रेष्ठ तो आहे जो चारित्र्याने श्रेष्ठ असावा. महाराष्ट्रातील महान संत तुकाराम महाराज म्हणतात, अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्नाभीन्न ? आणि हीच भूमिका आधुनिक विज्ञानाची आहे. अखिल मानवजातीत रक्ताचे नाते असल्याचे विज्ञानाने सिध्द केले आहे. म्हणूनच तर आज आपण रक्तदान, नेत्रदान, किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांट करतो, हिंदूचे रक्त मुस्लिम रुग्णाला जीवदान देते तर प्रसंगी मुस्लिमांचे रक्त हिंदू रुग्णाला जीवदान देते, अर्थातच हा भेदभाव थोतांड आहे, भ्रम आहे, म्हणूनच तुकोबांनी म्हटले आहे, भेदाभेद भ्रम अमंगल ! पैगंबरांच्या संतांच्या व विज्ञानाच्या या समतेच्या व बंधूभावाच्या भूमिकेला आणखी बळकट करण्यासाठीच या सर्वधर्म सद्भावना संमेलना सार्थक ठरेल, असे सांगितले.
स्वाभिमानी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र

