पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने, पुणे
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
||सा विद्या या विमुक्तये ||
अष्टभुजा नारायणी अर्थात तुळस ही सर्वांना प्रिय, संजीवक औषधी, सजातीय ऊर्जा निर्माण करणारी, सर्व ऋतू काळात शुभ अशी मानली जाणारी वनस्पती आहे. माणसाचे आचरण तसेच असावे. हे आचरण उत्तम व्हावे यासाठी ज्या सिद्धी आहेत त्या आठ आहेत. या अष्टसिद्धीद्वारे माणसाने सत्कर्म करीत राहून त्यातून मोहमाया, षढ्रीपू, स्वार्थ, अहंकार बाजूला सारून शुद्ध कर्मफलाचे अर्थात मोक्षाचे स्वामी व्हावे असे सूभाषित सांगते. यालाच अनुसरून एक संस्कृत श्लोक/मंत्र/सुविचार/सूभाषित आहे.
||तत्कर्म यन्न बन्धाय सा विद्या या विमुक्तये।| आयासायापरं कर्म विद्यऽन्या शिल्पनैपुणम् ||
अष्टसिद्धी प्राप्त केल्याची अनेक उदाहरणे आपण पुराणातून वाचतो. तथापि या अष्ष्टसिद्धींचा दुरुपयोग कशाप्रकारे केला गेला व त्यातून सामाजिक हानी कशी झाली याच्याही नोंदी आपणास आढळतात. तेव्हा केवळ सिद्धी प्राप्त झाल्याने मुक्ती मिळत नसते तर त्या सिद्धी चा वापर करण्याची, सकारात्मक जाणीवांची विद्या प्राप्त झाल्याने मुक्ती अर्थात सुयश मिळते/मोक्ष मिळतो.
सत्कर्म माणसाला विविध बंधनांपासून मुक्त करते. हा मुक्तिचा सकारात्मक योग्य मार्ग दाखविते ती विद्या मिळविणे हे प्रत्येकाचे साध्य असावे .
या व्यतिरिक्त आपण जे काही करतो ते केवळ निपुणता देणारे कर्म होय.
आता या सुभाषिताचा अर्थ समजून घेताना विद्यार्जन हे सर्वश्रेष्ठ कर्म आहे हे सूत्र समजून घेणे गरजेचे आहे.
जन्मजात कर्म करीत राहणे आणि कर्मफलाचा उपभोग घेणे हा मनुष्य धर्म आहे. मात्र हे कर्म कसे असावे याचे मार्गदर्शन वरील सूत्रातून आपल्याला समजते. म्हणून अनेक शैक्षणिक संस्था आपले बोधवाक्य म्हणून "सा विद्या या विमुक्त ये" याचा स्वीकार करतात.
जन्मजात कर्म करीत असताना ते सत्कर्म कसे व्हावे हे सुविद्येनेच समजते.
मनुष्यप्राणी ६४ कलांमध्ये निपुण असू शकतो. पण त्या कलांचा अंगीकार करत असताना सामाजिक कल्याण करणे हे त्याचे सूत्र असायला पाहिजे हे सूत्र जर तो विसरला तर तो समाजाला विनाशाकडे घेऊन जातो. मग या ६४ कलांचा उपयोग काय? म्हणून केवळ नैपुण्य उपयोगाचे नसून या कलांचा वापर सामाजाच्या कल्याणासाठी कसा करावा हे शिकवते ती विद्या! आणि ती विद्या आपल्याला सर्व मोहमाया, षड्रीपू, त्रिविधताप, यापासून मुक्त करते या अर्थी विद्या ही सर्वश्रेष्ठ असून मोक्षदायी आहे असे हे सूत्र सांगते.

