अहमदनगर । प्रतिनिधी:-
सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर अनियमित अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे संपुर्ण खरीप हंगामातील सर्वच पिके जमीनदोस्त झाली आहेत.
ही बाब गांभीर्य लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज जाहिर करण्यात यावे असे शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे-पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.या विशेष पॅकेजच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल असेही पुढे म्हटले आहे.
तसेच सन २०१९ ला शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पण नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर नेहमीप्रमाणे अन्यायच झाल्याचे चित्र दिसत आहे.
म्हणून १) नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर प्रोत्साहन अनुदान रु.५०,०००/- (पन्नास हजार रुपये) मात्र देण्यात यावेत.
२) राष्ट्रीयकृत बँकांचे शाखा व्यवस्थापक यांचे दिरंगाईमुळे काही शेतकरी या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहू नयेत.
३) कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान या दोन्ही योजनांतून वंचित राहणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांना देखील सदर अनुदान मिळावे म्हणजेच अगदी शेवटचा कर्जदार शेतकरी देखील या अनुदानापासून वंचित राहणार नाही.
पुढील काळात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध योजना मिळाल्या तर जास्तीत जास्त शेतकरी नियमित कर्जदार होतील असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


