" मस्तकानं नतमस्तक व्हावं असं चरित्र म्हणजे शिवचरित्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्रं आहे ." -डॉ. प्रकाश पांढरमिसे.
श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीराचे बोराटवाडी येथे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: बावडा श्री शिवाजी एज्यूकेशन सोसायटीचे श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर मौजे बोराटवाडी ता.इंदापूर येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी इंदापूर तालुका राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी विभागीय समन्वयक डॉ. प्रकाश पांढरमिसे यांचे "छत्रपती शिवाजी महाराज व आजची तरुणाई " या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जसा ढाल तलवारीचा आहे तसाच तो शौर्य, धैर्य, औदार्य, समता, न्याय, बंधुता, स्त्रीसन्मानाचा आणि समाज परिवर्तनाबरोबरच आत्मसन्मानाचा आहे.
राजा होण्यासाठी लढाया जिंकाव्याच लागतात परंतु लोककल्याणकारी जाणता राजा होण्यासाठी रयतेची पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घ्यावी लागते. ती काळजी रायतेची छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली होती. स्वराज्यातील रयतेच्या बारीक सारीक गोष्टींची जाण भान त्यांना होती म्हणूनच त्यांना 'जाणता राजा' ही सर्वात मोठी बिरुदावली बहाल केली होती. जगतातील अनेक राष्ट्राला हेवा वाटावा असा छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास दैदिप्यमान व आदर्शवत असा आहे.
आजचा युवा वर्ग जोपर्यंत आतून पेटून उठत नाही तोपर्यंत वापरून घेणाऱ्यांचे उद्योग थांबतील असे आज तरी अजिबात वाटत नाही. आजच्या तरुणाईने शिवाजी महाराजांच्या आदर्शवत अशा इतिहासातून प्रेरणा घेतली पाहिजे. समाजाला आणि राष्ट्राला आदर्श वाटेल असे कार्य हाती घेऊन वाटचाल केली पाहिजे. प्रत्येक घरा घरात शिवचरित्र असायला हवे. त्याचे पारायण करायला हवे. शिवचरित्र हे दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंढ आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन, सर्वधर्मसमभाव, लोककल्याण कारिता, स्वातंत्र्य, समता,बंधुता, स्त्री सन्मान या तत्वांचा अंगीकार करते.ही तत्वे सखल मानवजातीला दिशादर्शक व मार्गदर्शक आहेत. आजच्या तरुणाईने याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे.कारण शिवचरित्र असं चरित्र आहे जे मस्तकाला ही नतमस्तक व्हायला भाग पाडतं.याचा आदर्श आजच्या तरुणाईने घ्यायला हवा.
महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या साजऱ्या करताना वाद्यांचा गजर करण्यापेक्षा विचारांचा जागर करायला हवा. ध्वनी प्रदूषण, होर्डिंग आणि बॅनरबाजी न करता महापुरुषांनी सांगितलेल्या आदर्शवत विचार संस्काराचा जागर केला पाहिजे. असे मौलिक व प्रेरणादायी विचार आजच्या तरुणाईला डॉ. पांढरमिसे यांनी आपल्या ओघवत्या व झंझावाती शैलीत मांडले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय मोरे यांनी केले.प्रास्ताविकामध्ये ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती 27 देशातील विद्यापीठात अभ्यासक्रम शिकवीला जातो. ही महाराष्ट्रासाठी सार्थ अभिमानाची गोष्ट आहे.आजच्या तरुणाईने नाकारत्मकतेला छेद देऊन सकारत्मक विचारांचा अंगीकार करून कृतिशील मार्ग अंगीकीरायला हवा. असे मौलिक विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मदन जाधव यांनी केले.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे होते तर आभार प्रा. रोहिणी सावंत यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विध्यार्थी उपस्थित होते.

