*शासनाने बळीराजाच्या मदतीसाठी पुढे यावे; नुकसानग्रस्त त्रस्त शेतकऱ्यांची मागणी
अभय पाटील - चांदूर बिस्वा
बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा या महसूल मंडळामध्ये तुर पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तूर पिके नष्ट झाली आहे, त्यामुळे कृषी विभाग व महसूल विभागाला अंबिका फाऊंडेशन व शेतकरी संघटनांनी निवेदन देऊन व अंबिका फाऊंडेशनच्या पाठपुराव्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात तूर पिकाचा सर्वे करण्यात आला. सर्वे करण्याकरिता तलाठी उके, कृषीसेवक भिडे यांनी शेतकऱ्यां समवेत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तुर पिकाचा सर्वे केला, तुर पिक ७० % नष्ट झाले आहे,.
असे निर्देशनात आले असल्याने शासनास तसा अहवालही पाठविण्यात आलेला असताना शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही एक रुपयाचीही मदत केलेली नाही, त्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून बळीराजा तुर पिकाची नुकसान भरपाई व पंतप्रधान पिक विमा मिळण्यासाठी प्रयत्न करत मोठ्या अपेक्षेने शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची वाट बघत आहे.
केंद्र व राज्य शासनाने आपल्या कुंभकर्णी झोपेतून उठून बळीराजाला अनुदान जाहीर करावे तसेच पंतप्रधान पिक विमासाठी शासनाचा सर्वे ग्राह्य धरून तुर पीकांना पिकविमा देण्यात यावा, शासनाने शेतकऱ्यांना तूर पिकासाठी अनुदान द्यावे,संकटात सापडलेल्या बळीराजास मदतीसाठी पुढे यावे,इतर बिनकामांच्या प्रश्नांकडे लक्ष विचलित न होऊ देता मुळ ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष द्यावे,संकटात सापडलेल्या बळीराजास त्याच्या संकटसमयी कामी यावे,अशी नुकसानग्रस्त त्रस्त शेतकरी बांधवांकडून मागणी करण्यात येत आहे.

