फक्त एक चांगला माणूस बना_साहित्यिका अंजली श्रीवास्तव
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २६/ करमाळा तालुका शहरातील नोबल स्कूल च्या इ. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप आणि शुभेच्छादिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त अध्यक्षीय भाषणात अंजली श्रीवास्तव यांनी मंगेश पाडगांवकर यांच्या कवितेच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शन केले. दुसऱ्याशी तुलना करत न बसता आपल्यातल्या दडलेल्या गुणांचा अंदाज घेऊन ते गुण विकसित करा. परिक्षेत फक्त भरघोस गुण मिळवून कोणी मोठा होत नसतो. किंवा यावर गुणवत्ता ठरत नसते. म्हणून आयुष्यात कितीही मोठे व्हा पण समाजासमोर एक चांगला माणूस म्हणून समोर या. मार्गदर्शन करताना असे मत साहित्यिका अंजली श्रीवास्तव यांनी मांडले.
गुरुचा संघर्ष पाहून तयार होणारे विद्यार्थी मग आयुष्यातल्या कुठल्याही संघर्षाला घाबरत नाहीत असे मत नृत्यशैली नृत्यालयाच्या संचालिका व समुपदेशक मितवा श्रीवास्तव अग्रवाल यांनी मांडले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नोबलच्या मा. मुख्याध्यापिका आसादे मैम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की आयुष्यातल्या प्रत्येक परीक्षेला निर्भयपणे व आत्मविश्वासाने जाणे खूप गरजेचे असते.
संकटात रक्ताची नाती पण दूर जातात पण जिद्द न सोडता ध्येयपूर्तीसाठी सज्ज व्हा.कितीही मोठे झालात तरी भूतकाळात थोडं तरी डोकावत जा. विद्या एकतपुरे मॅडम यांनी मुलांना दहावीच्या परीक्षेसाठी व घवघवीत यशासाठी शुभेच्छा देवून जिद्द सकारात्मक भूमिका आणि आत्मविश्वास यांची साथ कधीच सोडू नका असा ही संदेश दिला. यशराज पाटील, शिवम शिंदे, शुभम अनारसे व टिशा राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या शाळेने आम्हाला खूप काही दिले गुरुंची मेहनत आम्ही वाया जाऊ देणार नाही शाळेने आम्हाला घरासारखे जपले अशा प्रकारच्या भावना विद्यार्थ्यांनी रडत व्यक्त केल्या. स्वागत आणि प्रास्ताविक रजनी साळुंखे मॅडम यांनी केले तर आभार मंगल जगताप मॅडम यांनी मानले. विद्यार्थ्यांनी शाळेला शाहू फूले आंबेडकर यांच्या प्रतिमा भेट दिल्या व कार्यक्रमाची सांगता झाली.

