निफाड:- भारत स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत भारताच्या विकासात धरणांची निर्मिती,रेल्वेलाईन,पुलांची निर्मिती,गड किल्ले,मुर्ती,मंदिरांची,घरांची निर्मिती करून भारताच्या विकासात महत्वपुर्ण योगदान असणारा हा वडार समाज आजही विकासापासून कोसोदूर राहिलेला आहे.
या गोष्टीचा विचार करुन या समाजासाठी पै.मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ मंजूर करुन अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महामंडळासाठी ऐतिहासिक पाठपुरावा करणारे समाजाचे कैवारी आमदार अभिमन्यू पवार यांचा शिवक्रांती वडार फाऊंडेशनच्या वतीने प्रदेश कार्यकारणीचे रविजी शिंदे,राजू जाधव,बलराज वारकर,अनिल शेलार, सदाशिव जाधव, शंकर माने,रश्मि ताई जाधव,समाधान कापसे,दिपक शिंदे,विष्णु पवार, पिंटु चौघुले, गणेश कुसळे,शरद जाधव, गणेश देवकर, धोंडिराम शिंदे व सर्व पदाधिकारी यांनी वाद्यवृंद समवेत भव्य पुष्पहार घालून सत्कार केला.
वडार समाज सामाजिक, राजकीय,शैक्षणिक व आर्थिक विकासापासून कोसोदूर असल्याने समाजाकरिता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी. अशी अनेक वर्षापासून मागणी होत होती. याकरिता शिवक्रांती वडार फाऊंडेशनच्या वतीने राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. तसेच औसा मतदारसंघाचे आदरणीय आमदार अभिमन्यूजी पवार यांनीही याकरिता महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मागणीची दखल घेत यावर्षीच्या अर्थसंकल्पात वडार समाजाकरिता पै.मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ मंजूर करुन 50 कोटी निधी देण्याची घोषणा केल्यामुळे समाजामधून आनंद व्यक्त होत आहे. महामंडळाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई त्याच्या 'सागर' या निवासस्थानी भेट घेऊन शिवक्रांती वडार फाऊंडेशनच्या वतीने प्रदेश कार्यकारणीने वाद्यवृदासमवेत भव्य पुष्पहार घालून सत्कार केला. तसेच समाजाच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे औशाचे आमदार अभिमन्यूजी पवार यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी विशेष म्हणजे वडार समाजाचा मान वाढल्यामुळे टोपी परिधान करून वडार समाजाचे प्रतिक गळ्यात पिवळी शाल घालून आनंद व्येक्त करण्यात आला. यावेळी शिवक्रांती वडार फाऊंडेशनचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.






