डॉ.बाबासाहेबांचा जनतेच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष - हर्षवर्धन पाटील
- आंबेडकर जयंतीनिमित्त दिल्या शुभेच्छा.
इंदापूर : प्रतिनिधी दि.14/4/23
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये जनतेच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला व त्यामध्ये ते यशस्वी झाले. डॉ.बाबासाहेबांनी लिहिलेल्या आदर्श संविधानामुळे देश सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे, असे गौरवोद्गार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.14) काढले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती निमित्त हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यात शुक्रवारी दिवसभर ठिकठिकाणी झालेल्या जयंती उत्सव कार्यक्रमात सहभागी होत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन केले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी जनतेला जयंती दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यात सर्वत्र जयंतीचा उत्सव आनंदी वातावरणात साजरा केला जात आहे. डॉ. बाबासाहेबांनी जगात आदर्श ठरेल अशी भारतीय राज्यघटना लिहिली. डॉ.बाबासाहेबांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान होते, अभ्यास होता. डॉ.आंबेडकर यांनी जातिभेद नष्ट करणेसाठी संघर्ष केला. जे संघर्ष करतात ते नेहमी यशस्वी होतात, अशी शिकवण डॉ. बाबासाहेबांनी दिली.
आज आंबेडकर जयंती आहे. रामनवमी, हनुमान जयंती, महात्मा फुले जयंती साजरी झाली. सध्या रमजान सुरू आहे. गावोगावी यात्रा सुरु आहेत. देशात सर्व जाती धर्माचे नागरिक एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहे, ही ताकद डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे पहावयास मिळत आहे. सर्वांनी एकोप्याने, आनंदाने राहावे हे बाबासाहेबांना अभिप्रेत होते. त्यामुळेच देश आज जगात महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार प्रत्येकाने आचरणात आणण्याची गरज आहे, असे आवाहनही इंदापूर तालुक्यात ठीक-ठिकाणी जयंती उत्सव कार्यक्रमांमध्ये बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी केले.

