तुझ्या भारतभूवर माधवा
बघ आज काय आहे घडत
जिथे नारीच्या सन्मानासाठी
तू घडवला होतास महाभारत
निर्वस्त्र काढली रे त्यांनी
दोन हतबल अबलांची धिंड
नि धृतराष्ट्राच्या मंत्र्यांसारखे
बघ राज्यकर्ते झाले कसे षंढ
दुर्योधनाला सांभाळला तसं
त्या नराधमांना सांभाळतात ते?
नाहीतर मग सांग ना अजुनही
का मोकाट,जीवंत आहेत ते?
म्हणे आताचे राज्यकर्ते
जगाला सांगतात तुझा धर्म
मग सांग आता जो झाला
तो कुणाचा आहे अधर्म?
"या राज्यातही त्या राज्यातही,
निंदनीय कृत्य झाले, म्हणे
काय एवढेच काम राहीले त्यांना,
जिथे तिथे राजकारण शोधने
कुठली संस्कृती खरी?
तू सांगितलास ती....
कि आम्ही उघड्या
डोळ्यांनी बघतोय ती.....
आणि जात नाही ती जात...
सांग माधवा कधी जाणार ?
नाहीतर तर तुझ्या गोटात
आजही कर्ण नाही येणार
वाटतच नाही का कुणाला
आज दृष्ट कृत्याची लाज
विकृतीला समजून संस्कृती
जो तो करतोय इथे माज
खरंच द्रौपदी सम आर्त हाक
आलीच नाही का रे तुला
कि अस्तित्वातच नाहीस तू
सारा शाब्दिक खोटा घोटाळा...
दिपक कुरळपकर

