हर्षवर्धन पाटील यांचेकडून बेलवाडी येथे मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन
- हर्षवर्धन पाटील यांची अंत्यसंस्कारासही उपस्थिती
इंदापूर : प्रतिनिधी दि.4/8/23
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बेलवाडी येथे म्हसोबावाडी विहीर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांचे शुक्रवारी (दि.4) सायंकाळी सांत्वन केले व रात्री अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित राहत मृत कामगारांना श्रद्धांजली अर्पण केली.
म्हसोबावाडी येथे घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून, सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, परशुराम बन्सिलाल चव्हाण, मनोज मारूती चव्हाण, जावेद अकबर मुलाणी यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आंम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना आगामी काळातही सहकार्य केले जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
या घटनेची मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून माहिती दिली, त्यावेळी त्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. राज्य शासन मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी म्हसोबावाडी येथील विहीर दुर्घटनेची सविस्तर माहिती अँड.शरद जामदार व सहकाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिली.

