इंदापूरकरांकडून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला मशाल रॅली
एक शाम देश के नाम सुरेल गीतांचा कार्यक्रमाने स्वातंत्र्य दिनाचे स्वागत
इंदापूर प्रतिनिधी : देशाच्या स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण झाल्याने, तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने इंदापूर शहरांतील नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला ( दि. १४ ऑगस्ट ) रोजी रात्री १० ते १२ वाजता शहरातील विविध भागातून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सामजिक कार्यकर्ते पांडुरंग तात्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परंपरेनुसार हातात शेकडो मशाली घेवून, मशाल रॅली काढली.
इंदापूर येथे मशाल रॅलीत इंदापूर शहरातील युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष धनंजय बाब्रस, विठ्ठलराव ननवरे, नगरसेवक बाळासाहेब ढवळे, अनिकेत वाघ, वसंतराव मालुंजकर, स्वप्नील राऊत, अमर गाडे, जय इन्स्टिट्यूटचे संस्थापक जयंतराव नायकुडे, सामजिक कार्यकर्ते अनिल राऊत, मारुती मारकड, अहमदरजा सय्यद, सुधीर मखरे, महादेव लोखंडे, वसीम बागवान, प्रा. अशोक मखरे, मनोज पवार, दादासाहेब सोनावणे, दिलीप वाघमारे आदी इंदापूरकर सहभागी झाले होते.
इंदापूर नगर परिषदेपासून मशाल रॅलीला सुरवात करण्यात आली. पुढे हनुमान मंदिर मार्गे खडकपुरा, शेख मोहल्ला, नेहरू चौक, मुख्य बाजार पेठ, कांबळे गल्ली, पंचायत समिती मार्गे, भारत माता की जय, जय जवान जय किसान व देशभक्तीपर घोषणा देत, इंदापूर नगरपरिषदे समोर सांगता सभेने रॅली संपन्न झाली.
तत्पूर्वी नगरपरिषदेच्या प्रांगणात शारदा स्वरांजली सिंगर्स ग्रुप प्रस्तुत, "एक शाम देश के नाम" या देशभक्तीपर गीतांचा सदाबहार कार्यक्रम, संगीतगुरू सौ. शारदा बलभीम नागपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी इंदापूर शहरातील नागरिकांनी कार्यक्रमासाठी मोठी गर्दी केली होती.
चौकट : आता सर्व जनतेला सुज्ञ नागरिक बनण्याची गरज
देशाच्या स्वातंत्र्यानंतर आता देशातील १४० कोटी जनतेने सुज्ञ होण्याची गरज आहे. आत्ता हातात शस्त्र घेवून क्रांती करण्याची गरज उरली नाही, तर लेखणीच्या रूपाने, ज्ञानाच्या रूपाने क्रांती होईल. त्यामुळे देशातील युवकांनी आता ज्ञानावर भर देण्याची आवश्यकता आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केले.

