कंदील अन् नांगर विकत विकत बहुजनांच्या झोपडीपर्यंत ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणारे कर्मवीर भाऊराव पाटील -प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे
इंदापूर (प्रतिनिधि): श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विध्यार्थिनी कोमल कापरे व प्रगती वाघमारे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या प्रा. शिवाली माने देशमुख होत्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण होत असताना महात्मा जोतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे व राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यामुळे ते प्रभावित झाले. याच दरम्यान त्यांचा सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीशी परिचय झाला व ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनले. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन कार्याची ओळख करून देताना ते म्हणाले,कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ओगले ग्लास वर्क्सर, किर्लोस्कर ब्रदर्स या कंपन्यांचे फिरते विक्रेते म्हणून काम करीत असताना संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती केली. त्यांच्या भ्रमंतीमुळे त्यांना ग्रामीण विभागातील जनतेच्या प्रचंड दारिद्रयाची, भयंकर अज्ञानाची व अंधश्रद्धेची जाणीव झाली. त्यांच्या या बहुतेक समस्यांवर ‘शिक्षण’ हा एकमेव महत्त्वाचा उपाय आहे असा विचार त्यांनी केला.
ग्रामीण भागातील प्रश्न जर सोडवायचे असतील तर तेथे शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत जरूरीचे आहे असे त्यांना वाटते, म्हणून त्यांनी १९१९ मध्ये ‘रयत शिक्षण संस्थेची’ स्थापना केली. कंदील आणि नांगर विकता विकता गोर गरीब वंचित उपेक्षित बहुजन समाजाच्या झोपडीपर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या तत्वाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश निर्माण केला. अज्ञान अंधःकारणे काळोखात चाचपाडणाऱ्या समाजाच्या जीवनात ज्ञानाच्या प्रकाश निर्माण करून बनवले.
कर्मवीर अण्णा म्हणत,शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने माणूस बहुश्रृत व विवेकी बनतो.शिक्षण हे साध्य नाही, साधन आहे. भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी नुसते डोक्यावरचे केस वाढवायचे नसतात, तर त्याने डोक्यातले विचार वाढविले पाहिजे, असे त्यांचे मत होते. महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल ‘कर्मवीर’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.
भारत सरकारने ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांना सन्मानित केले. पुणे विद्यापीठाने त्यांना १९५९मध्ये ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
कार्यक्रमासाठी उपप्रचार्य डॉ. संजय मोरे, कार्यालयीन अधीक्षक सुशील निंबाळकर व सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विध्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार करीना घोळवे हिने मानले.

