श्रीरामपूर (वार्ताहर ):- रयत शिक्षण संस्थेच्या मुळाशी निरपेक्ष सेवेचा वसा आणि वारसा आहे. पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तळागाळातील मुलांसाठी 04ऑक्टोबर 1919रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.त्यांनी स्वतःसाठी काहीच केले नाही तर फक्त समाजाला सर्वस्व दिले,ते त्यागी महापुरुष होते, हा कर्मवीरांच्या जीवनाचा समर्पित सेवाआदर्श जपला तरच गोरगरिबांच्या मनात आणि शिक्षणक्षेत्रात शिक्षणाची प्रतिष्ठा वाढेल, असे विचार महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष व महाराष्ट्र शासन अधिस्वीकृती समितीचे सदस्य पत्रकार प्रकाश कुलथे यांनी व्यक्त केले.
येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे बोरावकेनगरमधील प्रतिष्ठान कार्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136वी जयंती, स्व.नामदेवराव सुकळे दुसऱे पुण्यस्मरणनिमित्त जीवनगौरव पुरस्कार वितरण आणि कर्मवीर एक निरपेक्ष शिक्षणतपस्वी परिसंवाद असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार प्रकाश कुलथे बोलत होते.अध्यक्षस्थानी बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश मेहेकरकर होते. प्रारंभी प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रतिष्ठान संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा, उपस्थित मान्यवरांचे सत्कार केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. लेविन भोसले यांनी मानपत्र वाचन केले. अध्यक्ष डॉ. प्रकाश मेहेकरकर यांच्या हस्ते श्रीमती आशालता दिगंबर कल्याणकर यांना स्व. नामदेवराव विश्वनाथ सुकळे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुरेश निकडे व श्रीमती कल्याणकर यांनी सत्काराला उत्तर दिले.सुभाष पाऱे या गरीब व्यक्तीस मदत देण्यात आली.
यावेळी माजी प्राचार्य टी. ई. शेळके, माजी प्राचार्य शन्करराव अनारसे, माजी प्राचार्य डॉ.शन्करराव गागरे, जेष्ठ नागरिक आनंद मेळावा अध्यक्ष लक्ष्मणराव निकम,काशिनाथ गोराणे, माजी तहसीलदार गुलाबराव पादीर आदिंनी मनोगत व्यक्त केले.पत्रकार प्रकाश कुलथे आपल्या भाषणात पुढे म्हणाले, सुखदेव सुकळेसर यांचे कार्य सेवाभावाचे आहे. आपल्या भावाचे मोठेपण आणि कुटुंबस्नेहाचे नाते त्यांनी जपले आहे.कर्मवीरांचा विचार त्यांनी कार्यरूपाने जपला आहे.तर अध्यक्ष डॉ.प्रकाश मेहेकरकर यांनी श्रीमती आशालता दिगंबर कल्याणकर यांच्या 80 वर्षाच्या तपस्वी जीवनाचा विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानने खरा गौरव केला, त्याबद्दल सुखदेव सुकळे, बुरकुले परिवार, पदाधिकारी यांचे कौतुक केले.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी कर्मवीर एक निरपेक्ष शिक्षणतपस्वी या विषयावर मनोगत व्यक्त करीत कर्मवीर कविता सादर करीत सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी कस्तुरबाई नामदेव सुकळे, महेश नामदेव सुकळे,सुरेश कल्याणकर, बाळासाहेब बुरकुले, सौ.सुरेखा बुरकुले,संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले आदिंनी नियोजनात भाग घेतला.प्रा.रामचंद्र सुंदरदास राऊत, प्रा. रमेश चौधरी, प्रा. शिवाजीराव बारगळ,सुभाष वाघुंडे, सौ. कल्पनाताई वाघुंडे, डॉ.दिलीप शेजवळ, विष्णू भगत,आरोग्यमित्र भीमराज बागुल,चारुदत्त श्रीखंडे, रंगनाथ माने, आबा साळुंखे,भांडारीसर, बाबासाहेब चेडे आदी उपस्थित होते. सौ.उज्ज्वला बाळासाहेब बुरकुले यांनी आभार मानले.

