समस्त क्रिकेट जगताचं आकर्षण असलेला आशिया चषकातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी व सख्खे शेजारी भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना वरूणराजाच्या आक्रमणामुळे कोणत्याही निकालाविना आयोजकांना रद्द करावा लागला. परिणामतः दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण विभागून द्यावा लागला. या एक गुणाने पाकिस्तानला पुढील फेरीत निश्चित करता आला. कारण त्यांनी नेपाळ विरूध्द यापूर्वीच विजय मिळविला आहे. आता भारताला सोमवारी नेपाळ विरूद्ध सोमवारी होणाऱ्या सामन्यात विजय किंवा अनिर्णित असा निकाल चालेल मात्र पराभव झाल्यास स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागू शकतो.
शनिवारी कँडीमध्ये झालेल्या सामन्यात क्रिकेटपेक्षा पावसाचाच खेळ जगभरातील करोडो क्रिकेट शौकीनांना बघायला मिळाला. पावसाने वारंवार व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेतली खरी. मात्र सामना सुरू होऊन काही वेळ होत नाही तोच पावसाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. पहिल्या व्यत्ययापूर्वी कर्णधार रोहित शर्मा चांगलाच रंगात दिसत होता तर दुसरा सलामीवीर शुभमन गिल बिचकत खेळत होता. पावसाच्या उघडीपीनंतर लय बिघडलेला रोहित शर्मा शाहिन आफ्रिदीच्या झपकन आत आलेल्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.
पाक विरूध्द सातत्याने यशस्वी होत असलेला विराट कोहली, मी कालच्या लेखात लिहील्याप्रमाणे पाकच्या गोड बोलण्याच्या जाळ्यात अडकला व एक बेजबाबदार फटका स्टंप्सवर ओढवून बसला. श्रेयस अय्यरही चांगल्या सुरूवातीनंतर बेजबाबदार फटका मारून झेलबाद झाला. त्याच्या पाठोपाठ शुभमन गिल कोहली, रोहित सारखाचा त्रिफळाचित झाला. गिल जितका वेळ खेळला तितका संघासाठी बोजा वाटत होता.
चार बाद सहासष्ठ अशी पंधराव्या षटकात बिकट अवस्था असताना संघात खेळायला मिळेल का नाही हे माहितही नसलेला ईशान किशन वनडे कारकिर्दीत प्रथमच पाचव्या क्रमाकांवर खेळला. विंडीजविरूध्द मालिकाविर ठरलेल्या ईशानने तोच टेंपो राखून भारताची लाजच नाही तर पतही राखली. उपकर्णधार हार्दिक पांड्यासह पाचव्या गड्यासाठी १३८ धावा जोडताना स्वतः १०१ च्या सरासरीने ८२ धावा ठोकल्या तर हार्दिकने ८७ धावा काढल्या. या दोघांनंतर सर्वाधिक विस धावा पाकच्या गोलंदाजांनी दिलेल्या अवांतर धावा होत्या. यावरून मोठया नावाचे भारतीय फलंदाज पाकच्या गोलंदाजांसमोर कसे लाचार झाले हे सगळ्या क्रिकेट जगताने पाहिले. शेवटी बुमराहाने १६ धावा काढून संघाची इज्जत राखली. शिवाय पाकच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाने कमीत कमीत तीस धावा भारताच्या झोळीत टाकल्याने २६६ धावा तरी फलकावर झळकल्या. नाहीतर आयपीएल स्टार्सचे लक्तरे पहिल्याच सामन्यात वेशीला टांगले असते.
प्रमुख फलंदाजांची गचाळ फलंदाजी सुधारली नाही तर भारताला हि स्पर्धाच नाही तर पुढच्या महिन्यात मायदेशात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारताचं भविष्य धोक्यात असेल. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनीच भारताचा आख्खा संघ तंबूत धाडला. शिवाय पूर्ण पन्नास षटकेही भारताला खेळू दिले नाही.
मात्र पावसाने नंतर खेळच होऊ न शकल्याने कोण जिंकलं असतं हे गुलदस्त्यातच राहिलं. स्पर्धेच्या नियमानुसार वाया गेलेला एक तासापर्यंतचा वेळ पुढे कोणतेही षटके कमी न करता वाढवता येतो. मात्र येथे सामना सुरू झाल्यापासून पावणे दोन तास वेळ वाया गेला होता. त्यामुळे षटके कमी झाले असते. मात्र पाकचे उद्दीष्टही कमी झाले असते. त्यामुळे पाकच्या विजयाची शक्यता मोठी होती. मात्र भारताकडे चांगले चार वेगवान व दोन अव्वल फिरकीपटू असल्याने भारतालाही विजयाची संधी मिळाली असती. पण वरूण राजाला वेगळेच काही मंजूर असल्याने झाकली मुठ सव्वा लाखाचीच राहीली.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.

