shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वाभिमानी जिल्हा कृती समिती बैठकीत ठराव...श्रीरामपूर जिल्हा न केला गेल्यास विधानसभा व लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकणार...l


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर हेच नवीन जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे जर श्रीरामपूर जिल्हा केला नाही तर सर्व श्रीरामपूर ची जनता विधानसभा व लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकतील असा ठराव स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला.

श्रीरामपूर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे स्वाभिमानी जिल्हा कृती समितीची बैठक अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांनी आयोजित केली होती, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे तर प्रमुख उपस्थिती म्हणून तालुक्याचे माजी आमदार तथा शिवसेना नेते भाऊसाहेब कांबळे, मनसेचे बाबा शिंदे, भीमशक्तीचे संदीप मगर, श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अशोक उपाध्ये, राजेंद्र सोनवणे, माजी नगरसेवक हाजी मुख्तारभाई शहा,आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष राहुल मुथा,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय नगरकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरुण पाटील, सलीमखान पठाण, अ.भा.लहुजी सेनेचे हानिफभाई पठाण, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शेखर दुबैय्या, बाळासाहेब पवार,शरद शेरकर आदी शहरातील प्रमुख नागरिक उपस्थित होते.
 या बैठकीत बोलताना माजी आमदार भाऊसाहेब कांबळे म्हणाले की, जर श्रीरामपूर जिल्हा केला नाही तर सर्वांनी येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकावा, त्याला सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. श्रीरामपूर जिल्ह्याचा प्रश्न महत्त्वाचा असून त्यासाठी सर्वच नेत्यांना भेटण्यात कोणीही मनात कुठले राजकारण न ठेवता मनाचा मोठेपणा करून प्रत्येकाला भेटून सर्व आजी - माजी नेत्यांना या श्रीरामपूर जिल्ह्याच्या प्रश्नात रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडू असे यावेळी सांगण्यात आले. मनसेचे बाबा शिंदे म्हणाले की, श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी मोठी चळवळ उभारली पाहिजे सर्वांना बरोबर घेतले पाहिजे तरच ही चळवळ यशस्वी होईल अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे म्हणाले की, श्रीरामपूरच्या पाण्याचा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे तितकाच श्रीरामपूर जिल्ह्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे यासाठी सर्व राजकारण्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. समितीच्या सर्वांनी प्रत्येकाला भेटून श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आंदोलनात सहभागी करून घेतले पाहिजे तरच हे आंदोलन यशस्वी होईल,श्रीरामपूर जिल्ह्याचा प्रश्न हा फार वर्षांपूर्वींचा असून आता सुभाष त्रिभुवन यांचे केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्याशी जवळचे संबंध आहेत, त्यांनी आठवले साहेबांमार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी श्रीरामपूर जिल्हा स्वाभिमानी समितीच्या सदस्यांची भेट घडवून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीरामपूर हा श्रीरामाच्या नावाचा हिंदुस्थानातला पहिला जिल्हा घोषित करावा तसे महाराष्ट्र शासनाला भाग पाडावे यासाठी प्रयत्न करावे असे सुचविले त्याला सर्वांनी पाठिंबा दर्शविला.
यावेळी बोलताना अशोक उपाध्ये म्हणाले की,श्रीरामपूर जिल्ह्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले पाहिजे, श्रीरामपूरच्या भवितव्यासाठी श्रीरामपूर जिल्हा होणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले .
माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे म्हणाले की, श्रीरामपूर जिल्ह्यासाठी सर्व जनमत एकत्र करू व हे जनमत व आपले आंदोलन पाहून नेते मंडळींना देखील लाजत - गाजत का होईना आपल्याला साथ देण्याची वेळ आली पाहिजे असे आंदोलन उभारू असे ते म्हणाले.
माजी नगरसेवक हाजी मुक्ताभाई शहा म्हणाले की, श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी सर्व मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहेच सर्वजण प्रत्येक आंदोलनात सहभागी होतील श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभारावा असे ते म्हणाले, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष सलीमखान पठाण म्हणाले की, श्रीरामपूर जिल्हा जवळजवळ घोषित झाला होता, त्याला साक्षीदार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आहेत स्व. गोविंदराव आदिक,स्व‌.जयंतराव ससाणे स्व. विलासराव देशमुख या तिघांनी श्रीरामपूर जिल्ह्यासाठी निर्णय घेण्यापर्यंत प्रशासकीय पातळीवर कामगिरी बजावली मात्र त्यावेळचे राज्यातील मंत्री पदाची मोठी जबाबदारी संभाळणारे जिल्ह्यातीलच एक मंत्री यांनी जिल्हा घोषित करू नका असे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना त्यावेळी म्हटल्याने तेव्हा घोषणा होऊ शकली नाही,म्हणून आजपर्यंत श्रीरामपूर जिल्ह्याचा विषय रेंगाळत राहीला,आता ही शेवटची संधी असून निवडणूकीच्या आधी श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एक व्हावे असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय नगरकर म्हणाली की, शासनाकडे जिल्हा विभाजनासाठी जर निधी नाही,मग आता अपर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी निधी कसा आला असावा ?, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.जनतेची एकता, सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचा समन्वय आणी राज्यकर्त्यांची मानसिकता असल्यास सर्वकाही शक्य आहे, अशक्य असे काहीच नाही असेही ते म्हणाले.
 या बैठकीत प्रत्येक राजकीय पक्षाच्या आजी-माजी नेत्यांना भेटून श्रीरामपूर जिल्ह्याचा प्रश्न सोडवता यावा म्हणून प्रयत्न करणे असा आग्रह धरण्यासाठी भेटी घेण्याचे शेवटी ठरले.यावर सर्वांनी सहमती दर्शविली.


*सहयोगी:
पत्रकार राजु मिर्झा - श्रीरामपूर 
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close