कामगार मंत्र्यांची वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांच्या प्रश्नांबाबत मंगळवारी बैठक - हर्षवर्धन पाटील
- मुंबई मंत्रालयात बैठकीला उपस्थित राहण्याचे शासनाच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रण.
इंदापूर : प्रतिनिधी दि. 27/12/23
मे.वालचंदनगर इंडस्ट्रीजचे कामगार दि. २२ नोव्हेंबर पासून विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर आहेत. राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत मुंबईत मंत्रालयात मंगळवार दि. २ जानेवारी रोजी सर्व संबंधितांच्या बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
हर्षवर्धन पाटील यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांचेशी दि.१० डिसें. रोजी दूरध्वनीवरुन चर्चा करून वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांच्या संपासंदर्भात सर्व संबंधितांची तातडीने बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी विनंती केली होती. त्यावरती चालु असलेले विधिमंडळाचे अधिवेशन संपताच तात्काळ सर्व संबंधितांची बैठक घेतली जाईल, असे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी हर्षवर्धन पाटील यांना सांगितले असल्याचे पाटील यांनी माहिती देताना सांगितले. तसेच पाटील यांनी केलेल्या विनंतीनुसार कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कामगारांच्या प्रश्नावर मुंबईत बैठकीचे आयोजन केले असल्याचे व या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण त्यांना शासनाच्या वतीने देण्यात आले असल्याचे माहिती देताना सांगितले. वालचंदनगर कंपनीतील कामगार थकीत पगार व १७-१८ महिन्यांपासून मुदत संपलेला वेतनवाढीचा करार करणे संदर्भात बेमुदत संपावरती आहेत. या बैठकीतून कामगारांच्या मागण्यांवरती निश्चितपणे तोडगा निघेल, असा आशावाद हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

