अहमदनगर / प्रतिनिधी:
नगर तालुक्यातील जेऊर येथील श्री संत तुकनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. ए. एन. सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनाखाली जेऊर येथील आठवडे बाजारात जाऊन "स्वच्छ भारत स्वस्थ भारत" असा नागरिकांना संदेश दिला आहे.
पावसाळ्यात आरोग्याची कशी काळजी घ्यावी, अशी कागदी फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी जेऊर येथील आठवडे बाजारात रॅलीमध्ये आपला सहभाग घेतला. यावेळी प्राचार्य सिद्दिकी यांनी जेऊर येथील ग्रामस्थांना उद्देशून आपल्या भाषणात सांगितले की, मानवी आरोग्य उत्तम राहण्यास उत्तम आहाराची नितांत गरज आहे. बाजारातून आणलेला भाजीपाला, फळे कसे स्वच्छ करावे व शुद्ध पाणी पिण्याचा व पाणी स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. त्याचबरोबर मलेरिया, डेंगू, चिकनगुनिया, टायफाईड, कावीळ व कुष्ठरोग अशा रोगांपासून नागरिकांनी दूर राहण्यासाठी आपल्या घरात आणि घराच्या परिसरात स्वच्छता ठेवावी, असे सुचविले.
गावातील व बाजारपेठेतील नागरिकांनी पावसाळी ऋतूमध्ये सतर्क राहून आरोग्याची काळजी घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले. यावेळी नागरिकांनी प्राचार्य सिद्दिकी आणि विद्यार्थ्यांच्या या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी श्री. मोरे सर, सौ. गाडेकर, सौ. बसापुरे, सौ. तोडमल, सौ. सकपाळ, श्री. आढाव आदी शिक्षकांसह कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.
*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट, श्रीरामपूर
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111